
Girish Mahajan on Nashik Guardian Minister: नाशिक पालकमंत्रिपदाबाबत देवाला माहीत असं सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. ‘झी 24 तास नाशिक सन्मान’ कार्यक्रमात त्यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलं. रायगड पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे प्रश्न सुटलेला नाही, असं महाजन यांनी सांगितलं आहे.
नाशिकला पालकमंत्री कधी मिळणार? या प्रश्नावर त्यांनी आता देवाला माहित, आपण काय सांगणार. देवाच्या भरवशावर सोडून देऊ असं उत्तर त्यांनी दिलं. “खरं म्हणजे नाशिकसाठी कुठे वाद नाही. पण रायगडसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघात खूप टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. ते आम्हाला म्हणतात नाशिक तुम्ही घेऊन टाका आणि रायगड आम्हाला द्या.”
“रायगडला एकच पालकमंत्री होणार आहे आणि दोघांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. पण प्रश्न सुटला नसला तर काही थांबलं आहे का?,” अशी विचारणाही त्यांनी केली. शेजाऱ्याच्या घऱात भांडण आणि तुम्हाला त्रास अशी स्थिती आहे का? विचारलं असता त्यांनी मान्य करत तसंच झालं असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, “भांडण्याचा आवाज आमच्याकडे जास्त येत आहे. आमची झोप उडवली आहे”.
मुंबई-नाशिक एसी लोकलसेवा सुरु करणार
दरम्यान यावेळी गिरीश महाजन यांनी मुंबई-नाशिक एसी लोकलसेवा सुरु करणार आणि मुंबई-नाशिक प्रवास दोन तासांवर आणणार अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. नाशिक विमानतळालाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, विकास उपक्रम, उद्योग, आर्थिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी हे आश्वासन दिलं आहे.
ते म्हणाले की, “मुंबई-नाशिक जोडण्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत असून लवकरच त्याची सुरुवात होईल. इतगपुरीपर्यंत, कसाऱ्यापर्यंत येणारी लोकल नाशिकपर्यंत आणत आहोत. म्हणजे दोन तासात मुंबई-नाशिक गाठता येईल. याचा खूप मोठा प्रभाव नाशिक शहरावर होणार आहे. नाशिकच्या विकासाला याचा हातभार लागेल. काही तांत्रिक कारणाने साधी लोकल चालवली जाऊ शकत नाही. पण एसी लोकल चालवण्यात कोणतीही अडचण नाही. तशी मागणीही मी केली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांनीही मागणी केली आहे. लवकरच ही लोकल सुरु होईल”.
“विमान जोडणी फार महत्त्वाची आहे. आता आपण जवळपास 1000 कोटींच्या कामाचा शुभारंभ केला आहे. धावपट्टीची लांबी वाढवली आहे. कार्गो येऊ शकेल, मालवाहतूक होऊ शकेल. नवीन धावपट्टयाही करत आहोत. पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. आंतरराष्ट्रीय वाहतूक कसं सुरु होईल यासाठी वर्षभरासाठी प्रयत्न आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



