
सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूद याने बैलाच्या जागी स्वतःला औताला जुंपणाऱ्या लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला मदतीचा हात देऊ केला आहे. त्यांनी या शेतकऱ्याशी संपर्क साधत त्यांना बैलजोडी देण्याची ग्वाही दिली आहे. या निमित्ताने सोनू सूदच्या म
.
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना आर्मनिर्भर अर्थात स्वावलंबी बनवण्याचे अनेक दावे करते. पण या दाव्यांची चिरफाड करणारा एक व्हिडिओ लातूर जिल्ह्यातून समोर आला. या व्हिडिओत एका 65 वर्षीय शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे स्वतःला त्याच्या जागी जुंपल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूद यांनी या शेतकऱ्याला बैलजोडी देण्याची घोषणा केली आहे. आप नंबर भेजिए, हम बैल भेजतें हैं, अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया सोनूने या प्रकरणी दिली.
स्थानिक प्रशासनही झाले सक्रिय
सोनू सूदच्या मदतीनंतर स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले. कृषी विभागाने या शेतकऱ्याला सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची व ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कृषी विभागाने त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.अंबादास पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान व शेतीसाठी आवश्यक साधने मिळणार आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी दिली आहे.
अहमदपूरच्या शेतकऱ्याचा होता व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ हा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावचा आहे. त्यात अंबादास पवार व त्यांच्या पत्नी शांताबाई पवार हे दोघे बैल नसल्यामुळे स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेतीची मशागत करताना दिसून येत आहेत. अंबादास पवार याविषयी बोलताना सांगतात, कुटुंबाचा चरितार्थ चालवताना आमच्यावर ही वेळ आली. सध्या मजुरीचा खर्च अमाप वाढला आहे. ट्रॅक्टरने पेरणी करणे परवडत नाही. आम्ही बैल बारदानाही घेऊ शकत नाही. शेतीत जेवढे पैसे लावले, त्याहून कमी पैसे हातात येतात. आम्ही बँकेकडून 40 हजारांचे कर्ज घेतले आहे. ते कर्ज आम्ही दरवर्षी भरतो. पुन्हा काढतो. आमचे गळ्याएवढे सोयाबीनचे पोते 4 हजार रुपयांना जाते. पण अवघ्या 25 किलोची सोयाबीनच्या बियाण्यांची बॅग 3 हजार घ्यावी लागते. खताचा भाव 1200 ते 1500 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतीतून जेवढे उत्पन्न निघते. तेवढ्यातच भागवावे लागते.
सरकारने कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा
शांताबाई पवार यांनी यावेळी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली. आमच्याकडे 5 एकर सामायिक जमीन आहे. पण पाण्याची सोय नाही. आमचा मुलगा पुण्यात जाऊन पोट भरतो. मुलगा शिकला नाही म्हणून ही वेळ आली आहे. आमच्या नातवंडांवर तरी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जोपर्यंत हात-पाय चालत आहेत, तोपर्यंत आम्ही शेतात काम करतो. हे काम करण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा कोणता पर्यायही नाही. शासनाने आमचे कर्ज माफ करून खते व बियाण्यांची व्यवस्था करावी, असे त्या म्हणाल्या.
समस्या ओळखून उपाययोजना करण्याची गरज
उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र हे भारताचे कृषिप्रधान राज्य आहे. शेती हा येथील लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. पण दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, बाजारातील अस्थिरता आणि पुरेशा सरकारी पाठबळाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सतत संकटात सापडले आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे. या समस्येचे मूळ शोधून त्यावर उपाययोजना करणे आजच्या काळाची गरज आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.