
हिंगोली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही लहान, मोठ्या पुलावरून पाणी वाहात असतांना पूल ओलांडण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
.
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. या शिवाय आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात तालुका व स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंचन तलाव, साठवण तलावाकडे लक्ष ठेवण्याबाबत विभागांना कळवण्यात आले असून गावपातळीवरही प्रशासनाकडून गावकऱ्यांशी संपर्क ठेवला जात आहे. नदी, नाल्या काठच्या गावांवर विशेष लक्ष दिले जात असून गरज भासल्यास तातडीने गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या खोल्या खुल्या केल्या जातील.
गावकऱ्यांनीही आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावाला पुराचा वेढा पडल्यास त्याची तातडीने तहसील कार्यालयास माहिती द्यावी. तसेच पूर परिस्थितीची माहिती तहसील कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन कक्षाला द्यावी. तहसील कार्यालयात नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
विजेच्या कडकडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.