
अमरावती जिल्ह्यात बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी शनिवारी राबवण्यात आलेली पटपडताळणी मोहीम पहिल्याच दिवशी इंटरनेटच्या समस्येमुळे बाधित झाली. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोजदाद कागद आणि पेन वापरून ऑफलाईन पद्धतीने करावी लागली. यामुळे पडताळणीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ९२७ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोजदाद करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी ८८२ शाळांमध्येच हे काम पूर्ण होऊ शकले. उर्वरित ४५ शाळांमध्ये पुढील टप्प्यात मोजदाद केली जाईल. या मोहिमेचे पुढील टप्पे १५ आणि २२ एप्रिल रोजी होणार आहेत. या संदर्भात नोडल अधिकारी तथा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. या पटपडताळणीसाठी उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेसाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मोजदाद करून त्याचा अहवाल ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते, परंतु इंटरनेटच्या अडथळ्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाईन करावी लागली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षांमुळे शासनाकडे आधीच नोंदवली गेली आहे. त्यामुळे या मोहिमेत दुसरी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची मोजदाद केली जात आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या एकूण २,८७१ शाळा आहेत, ज्यात ४ लाख ८३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ६ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. पटपडताळणीसाठी शाळांना तीन गटांमध्ये विभागले असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची नेमकी संख्या समोर येईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






