
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे आज सकाळपासून नॉट रिचेबल झालेत. मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर लगेचच झिरवाळ नॉट रिचेबल झाल्यामुळे याविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांना 50 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) अटक केली आहे. चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मंत्री झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण तत्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली आहे. पण विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने नैतिकतेच्या आधारावर तत्काळ त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल झालेत. सकाळपासून संपर्क कक्षेबाहेर यासंबंधीच्या माहितीनुसार, नरहरी झिरवाळ यांचा फोन आज सकाळपासून लागत नाही. ते आज कुणाला भेटलेही नाहीत. त्यामुळे ते कुठे गेले? व काय करत आहेत? हे स्पष्ट झाले नाही. अटक करण्यात आलेल्या लिपिकाने मंत्री झिरवाळांच्या स्वीय सहाय्यकाच्या सूचनेनुसार लाच घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे झिरवाळ एसीबीच्या रडारवर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कदाचित त्यामुळेच ते नॉट रिचेबल झाल्याचा संशयही या प्रकरणी व्यक्त केला जात आहे. लिपिक राजेंद्र ढेरिंगे याने मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यातील 35 हजारांची लाच घेताना एसीबीने त्याच्या मुसक्या आवळल्या. लाचखोरीशी संबंध आढळला तर राजीनामा देणार – झिरवाळ दुसरीकडे, नरहरी झिरवाळ यांनी आपला या लाचखोरीच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. तसेच आपला या प्रकरणाशी काही संबंध असल्याचे सिद्ध झाले तर आपण 100 टक्के राजीनामा देणार असेही ते म्हणालेत. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. त्यानंतरही माझा या प्रकरणात काही संबंध आढळला तर मी राजीनामा देईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणालेत. झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरीमागे भाजप – काँग्रेस नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लार्कला लाच घेताना पकडणे, हे भाजपचे राजकीय षडयंत्र असू शकते. विरोधकांना आणि मित्रपक्षांना बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणे हा यांचा जुना धंदा आहे. स्वतः ‘टक्केवारी’ च्या चिखलात रुतलेल्या सरकारने दुसऱ्यावर चिखलफेक करू नये. हे टक्केवारीचे सरकार आहे. आता मंत्रालयातही या गोष्टी चालू झाल्या आहेत. कोणत्याही कार्यालयात जा टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झाले आहे. प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात उघडपणे टक्केवारी मागितली जाते, असे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



