
पुणे येथे हिंदू महिला सभेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताचा दीडशे वर्षांचा प्रवास रसिकांनी अनुभवला. सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात ‘वंदे मातरम् १५०’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोज
.
ब्रिटिश राजवटीत डेप्युटी मॅजिस्ट्रेट पदावर कार्यरत असलेल्या बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी १८७५ च्या नोव्हेंबर महिन्यात ‘वंदे मातरम्’ची रचना केली. त्यांनी हे गीत त्यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत समाविष्ट केले. बंकिमचंद्र यांच्या निधनानंतरही, पुढील ७० वर्षांहून अधिक काळ हे गीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा बीजमंत्र ठरले.
‘वंदे मातरम्’च्या उच्चाराने मरगळलेल्या राष्ट्राला नवी चेतना मिळाली. या मंत्राने क्रांतिकारकांच्या सशस्त्र कृतींना प्रेरणा दिली, तर अहिंसेचे पालन करणाऱ्या सत्याग्रहींनाही तो तारक ठरला. स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य जनतेलाही या रचनेने लढण्याचे बळ दिले. हा संपूर्ण प्रेरणादायी प्रवास कार्यक्रमातून श्रोत्यांसमोर उलगडला.
लेखक आणि संशोधक मिलिंद सबनीस, दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी, संगीतकार अजय पराड, अभिवाचक अभिषेक खेडकर, प्रदीप फाटक आणि अवंती लोहोकरे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सुरेंद्र गोखले यांनी तांत्रिक साहाय्य केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा युद्धघोष ठरलेल्या या तेजस्वी काव्याचा अभिवाचनात्मक दृकश्राव्य प्रत्यय रसिकांची दाद मिळवणारा ठरला.
सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, हिंदू महिला सभेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने झाली आहे. त्यांच्या तेजस्वी विचारांचे पाठबळ संस्थेच्या उपक्रमांना मिळते. सावरकरांनी गौरवलेल्या ‘वंदे मातरम्’ रचनेचा संपूर्ण इतिहास सांगणारा हा कार्यक्रम अमृत महोत्सवाच्या सांगतेप्रसंगी अत्यंत औचित्यपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या नवरात्र महोत्सवाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. सुधा राजगुरू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.