
९ जून रोजी मुंबईतील अपघातात मृतांच्या नातेवाईकांना टाहो फोडला होता.
लोकल ट्रेन ही मुंबईतील चाकरमान्यांसाठी केवळ प्रवासाचे साधन नाही, ती त्यांच्या जीवनवाहिनीची भूमिका बजावते. मात्र, हीच जीवनवाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यूच्या गर्तेत ओढणारी ‘अपघातवाहिनी’ ठरू लागली आहे. ९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या दुर्द
.
मुंबईत दररोज सुमारे ७० लाख प्रवासी उपनगरी रेल्वेवर अवलंबून असतात. मात्र या सेवेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे प्रशासनाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षांत मुंबईत लोकल अपघातांमध्ये ५१ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर हजारो कुटुंबांच्या आयुष्याची वाताहत दर्शवणारी वास्तवचित्रं आहे.सकाळी कामावर जाण्यापासून ते संध्याकाळी घरी परत येईपर्यंत, चाकरमानी आपला दिनक्रम रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आखतो. ट्रेन चुकली तर ऑफिसला उशीर, ट्रेन वेळेवर मिळाली तर दिवस व्यवस्थित सुरू होतो, इतपत या सेवेला महत्त्व आहे. मात्र रोजच्या अपघाताने ही सेवा सुरक्षित आहे का हाच खरा प्रश्न आहे. भीषण गर्दी, ट्रेनमध्ये लटकून प्रवास, अपघात, उशीर, आणि तांत्रिक बिघाड हे सर्व समस्यांचे भाग आहेत. अनेकांना या समस्यांमुळे प्राण गमवावे लागले आहेत. तरीही, जीवनाची गरज म्हणून चाकरमानी याच गाड्यांमध्ये दररोजचा प्रवास करत राहतात.
मुंबईतील रेल्वे च्या १२ डब्ब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण तीन साडेतीन हजार आहे. मात्र या क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी दररोज रेल्वे लोकलमधून प्रवास करत असतात. रेल्वे प्रशासनाकडून सुधारण्यासाठी पावले उचलली जात आहेत. १५ डब्यांच्या लोकल्स, मोबाईल अॅपद्वारे तिकिट बुकिंग, नवीन उपनगरी मार्गांची आखणी, आणि सिग्नल यंत्रणेचा आधुनिकीकरण सुरू आहे. मुंब्र्याच्या दुर्घटनेनंतर मुंबईच्या नॉन-एसी लोकलनाही आता स्वयंचलित दरवाजे बसवले जावेत, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे प्रवासी दरवाज्यात लोंबकळू शकणार नाहीत. स्वयंचलित दरवाजे सध्या मुंबईत अत्यंत मर्यादित प्रमाणात धावणाऱ्या वातानुकूलित लोकलना आहेत.
मेट्रोलाही ते असतात.या स्वयंचलित दरवाज्यांमुळे हा प्रश्न सुटेल? अपघात टाळता येतील का ? हाच खरा प्रश्न आहे. मुंब्रा अपघात एक मोठा इशारा आहे. लाखो लोक अजूनही जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. यंत्रणा हतबल आहे, उद्या सकाळी पुन्हा तीच ट्रेन, तीच गर्दी, तोच प्रवास… आणि एक नवीन जोखीम. हे नित्याच झाले आहे. मुंब्राच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासन धडा घेईल का हाच खरा प्रश्न आहे.
शब्दांकन : संतोष गायकवाड
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.