
Murlidhar Mohol on Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांनी भाजपाच्या फाईल काढू असा इशारा दिला होता. अजित पवारांच्या इशा-यानंतर 10 दिवसांत अपघात झाला असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊतांनी संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच अमोल मिटकरी यांनीही विमानात 6 लोक असताना 5 मृतदेहच का सापडले? अशी शंका उपस्थित केली आहे. यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अहवाल आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हटलं आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि नागरी वाहतूक विमान विभागाला पत्र देत यासंदर्भात चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. यानंतर आमच्या डीजीसीएच्या टीम पोहोचल्या आणि ब्लॅक बॉक्स हस्तगत केला. यासंदर्भात चौकशी केली जाणार असून, लवकरच सत्य समोर येईल. पण ही वेळ नाही, महाराष्ट्र दु:खात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात वेदना आहेत की अजितदादा आपल्या नाहीत. ही भावना महत्त्वाची असून, त्यात राजकारण करणं, आरोप करणं योग्य नाही,” असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तर राऊतांना आता कोणी किंमत देत नाही असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे.
अजितदादांचा अपघात नाही, तर घातपात असल्याचं खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. घातपाताची शंका उपस्थित करताना मिटकरींनी राजेश टोपेंच्या विधानाचा दाखल दिला आहे. तसंच अनेक इतर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच एक दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्यता मांडा,अशी मागणीही मिटकरींनी केली आहे.
संजय राऊतांनी मिटकरींनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीर’ असून 6 लोक होते तर पाचच मृतदेह कसे? असं संजय राऊत म्हणाले आहेत. दादांचे कागद तसेच होते, हे कसं काय? हा मुद्दा संसदेतही उपस्थित करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या विमान अपघातग्रस्तासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलं आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाला असून यातून सत्य बाहेर येईल असं म्हटलं आहे. तर DGCA आणि AAIB टीम अपघाताच्या ठिकाणी तत्काळ पोहचून चौकशी प्रक्रिया केली असल्याचं म्हटलं आहे. लवकरच याचा अहवाल येईल असं मोहोळ यांनी सांगितलं आहे.
‘दाल में कुछ तो काला है’
दाल में कुछ तो काला है, असं वक्तव्य करत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघात नाहीतर घातपातचं म्हटलं जात असून महाराष्ट्रातील 80 टक्के लोक संशय व्यक्त करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच वेळेवर पायलट का बदलला गेला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत’
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत पोहोचला असून, त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. ब्लॅक बॉक्समधून अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. विमानाचे इतर अवशेषही दिल्लीत पोहचवले जातील.
28 जानेवारी रोजी बारामती विमान अपघातात अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत पोहोचला आहे. विमान अपघात तपास ब्युरोद्वारे ब्लॅक बॉक्स डीकोड केला जाणार आहे. या ब्लॅक बॉक्समधून विमान अपघातासंर्भात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. विमानाचे इतर अवशेषही लवकरच दिल्लीचा पोहचवले जाणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



