
मराठी माणसाची एकजूट मीरारोडच्या मोर्चात पाहायला मिळाली. मोर्चा होऊ नये यासाठी नेत्यांची धरपकड करण्यात आली. कार्यकर्त्यांना डांबण्यात आलं. पण मराठी माणसानं निश्चय केला की काय होतं हे मीरारोडमध्ये पाहायला मिळालं. पोलिसांनी अडवूनही मराठी एकजुटीचा आग्या मोहोळ मीरारोडच्या रस्त्यावर पाहायला मिळाला. विनाझेंडा फक्त मराठीचा अजेंडा मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता.
मराठी माणसाची ताकद काय आहे आणि मराठी माणसात गनिमी कावा कसा भिनलाय याचा उत्कृष्ट नमुना मीरारोडमध्ये पाहायला मिळाला. मीरारोडच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांनी खबरदारी म्हणून मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली होती.
– सकाळी 9.30 वा.
सकाळी साडेनऊ वाजता मिरा रोडच्या ओम शांती चौकात जो नेता आला त्याला पोलीस ताब्यात घेत होते… एका क्षणी मराठी माणसाचा मोर्चा होणारच नाही असं वाटत होतं. पण मराठी माणूस आतून पेटून उठलेला होता याची कल्पना पोलिसांना नसावी.
– सकाळी 10.00 वा.
पोलीस आलेल्या आंदोलकांना ताब्यात घेऊ लागले… जो दिसेल त्याला पोलीसांनी आणलेल्या बसेसमध्ये टाकू लागले… पण मराठी माणूस हटणारा नव्हता… जेवढ्या लोकांना ताब्यात घेतलं जात होतं. त्यापेक्षा दुप्पट लोकं शांती चौकात येत होते. कुणाला पकडू आणि कुणाला नाही अशी अवस्था पोलिसांची झाली होती. आंदोलक नसलेल्या सामान्य मराठी माणसालाही पकडून पोलीस नेत होते.
– सकाळी 11.00 वा.
आंदोलकांची संख्या एवढी वाढली की पोलिसांना आंदोलकांना पकडणं अशक्य झालं… आंदोलकांची संख्या सुरुवातीला शंभरच्या घरात होती. काही क्षणात आंदोलकांची संख्या दोनशेवर गेली. त्यानंतर आंदोलक पाचशेच्या घरात पोहोचले… अगदी काहीवेळात जनसमुदाय तिथं गोळा झाला होता… पकडा आणि पोलीस व्हॅनमध्ये कोंबा ही रणनिती सपशेल फेल ठरली होती. पोलीस आता फक्त बघ्याच्या भूमिकेत होते.
– सकाळी 11.30 वा.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आंदोलकांना काशिमीरा पोलीस ठाण्याजवळच्या लग्नाच्या हॉलमध्ये ठेवलं होतं.. तिथंही आंदोलक शांत बसले नव्हते… आंदोलकांनी घोषणा आणि मराठी गीतांच्या सुरांनी हॉल दणाणून टाकला होता.
– दुपारी 12.00 वा.
मराठीप्रेमी जनतेनं मिळेल त्या वाहनानं, लोकल पकडून मिरारोड गाठावं असं आवाहन मनसेनं केलं. मिरा रोड स्टेशनवरुन ओम शांती चौकाकडे जाणा-या मराठी आंदोलकांची संख्या वाढली. तिकडं सव्वा बाराच्या आसपास मोर्चाला परवानगी मिळाल्याचं वृत्त धडकलं. मराठी आंदोलकांचा उत्साह वाढला होता. आंदोलकांनी मिरा रोड रेल्वे स्टेशनकडं कूच केली. मराठीची ताकद दाखवण्यासाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता. य़ा मोर्चात फक्त शिवाजी महाराजांचे भगवे झेंडे होते. कोणत्याही पक्षाचा फलक तिथं नव्हता. हिंदू, मुस्लीम सगळे या मोर्चात होते. आपण मराठी आणि मोर्चा मराठीसाठी हा जयघोष होता. असा मोर्चा गेल्या 20 ते 30 वर्षांत झाला नाही. मराठीची ताकद क्षीण झालेली वाटत असतानाच मराठी भाषिकांचा आवाज काय असतो याचा अंदाज परप्रांतियांनाही आला आणि सत्ताधा-यांनाही…मराठीची ही एकजूट अशीच कायम राहिल्यास मराठीची गळचेपी दूर, मराठी भाषिकांविरोधात ब्र शब्द ही उच्चारण्याची कुणाची हिंमत होणार नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.