
Raj Thackeray MNS Banner Of Amit Thackeray Vs Parth Pawar: स्थानिक स्वराज्य संस्था खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील जवळीक वाढली आहे. महायुतीमधील पक्षांविरोधात मनसेनंही उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केवळ भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेनेवर नाही तर थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरही मनसेनं निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेकडून आता नवी मुंबईमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची तुलना करण्यात आली आहे.
नेमकी काय टीका?
नवी मुंबई येथे चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांनी दुग्धभिषेक करीत अनावरण केल्यानंतर नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं. या अनावरण सोहळ्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवत नोटीस बजावली आहे. याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात नितीन कंपनी चौकात मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यंगचित्र असलेलं बॅनर लावून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मनसेनं निशाणा साधलाय.
काय आहे या बॅनरवर?
“छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान,” असं अमित ठाकरे शिवरायांच्या पुतळ्याच्या पाया पडत असल्याचं चित्र रेखाटत म्हटलं आहे. तर या बॅनरवर दुसऱ्या बाजूला, “वाह रे सरकार अजब तुझा हा न्याय,” असे लिहिले आहे. सरकार 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना क्लिनचीट देते, असं बॅनरवर दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे आता या बॅनरला अजित पवारांची राष्ट्रवादी नेमकं काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सरकार हिंदूविरोधी
छत्रपतींचा सन्मान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करते व घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घालते ही सरकारची दुटप्पी भूमिका असून हे सरकार हिंदूविरोधी असल्याची टीका मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.
मुंबईत हातातून गेली तर…; राज ठाकरेंचा इशारा
“थोडे दिवस थांबा भाषणं सुरूच होतील. 11 वर्ष हा कोकण महोत्सव साजरा होत आहे. मला फक्त जाता जाता एवढीच गोष्ट सांगायची आहे. रात्र वैऱ्याची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्याप्रकारे राजकारण सुरू आहे. मतदार याद्या जे यात काही सुरू आहेत त्यावरती लक्ष ठेवा. मतदार खरी आहे खोटे आहे? यावर पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकाची निवडणूक शेवटची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली समजा. एकदा काय मुंबई हातातून गेली तर आपल्याला कोणालाही जमणार नाही. गाफील राहू नका एवढेच सांगायचं आहे. हातातून मुंबई गेली तर हे लोक थैमान घालतील,” असा इशारा राज ठाकरेंनी कोकण मोहोत्सवामध्ये दिलेल्या छोटेखानी भाषणात मुंबईतील मतदारांना दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



