
अमित शहांसोबतच्या स्नेहभोजनावेळी पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. अमित शहांना सोबतची भेट ही राजकीय नाही, तर कौटुंबीक भेट होती. पक्षाच्या पलिकडे जाऊन कौटुंबीक स्नेह कसा असू शकतो?
.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादामुळे गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद द्यावे, अशी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची आग्रही मागणी आहे. तर आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर होते. अमित शहा यांच्या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातच अमित शहा हे सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. या भोजनावेळी सुनील तटकरे पालकमंत्रीपदाबाबत अमित शहांशी चर्चा करतील, अशी चर्चा होती. मात्र, अमित शहांच्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नेमके काय म्हणाले सुनील तटकरे?
अमित शाह यांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. अमित शहांना सोबतची भेट ही राजकीय नाही, तर कौटुंबीक भेट होती. अतिशय मोकळ्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात संवाद झाला. जेवण हे अतिशय साध्या पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण होते. आमच्या विनंतीला मान देऊन शाह हे घरी आले, शाह यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. पालकमंत्रिपदावर यावेळी कोणतीही चर्चा झाली नाही. शाह यांच्या उपस्थितीमध्ये कौटुंबीक चर्चा झाली, असे सुनील तटकरे म्हणाले.
शहांकडे अनेक व्यक्तिमत्वाबाबतची माहिती असते
देशाच्या गृहमंत्र्यांना देशात कुठे काय चाललंय? हे माहिती असते. अनेक व्यक्तिमत्वाबाबतची माहिती त्यांच्याकडे असते. शेवटी ते मोठे नेते आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर ते आज त्या स्थानावर पोहोचलेत, याचा मला देखील अभिमान आहे. अनेकदा त्यांच्याशी संवाद साधताना देशातील राजकारणासह राज्यातील राजकारणाच्या खाचाखोचा माहिती होतात, असेही सुनील तटकरे म्हणालेत.
गोगावलेंच्या अनुपस्थितीबद्दल काय म्हणाले तटकरे?
अमित शाह यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले हे अनुपस्थित राहिले. याबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता, माझे कर्तव्य होते, मी भरतशेठ गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहीत नाही, पण मी माझे कर्तव्य केले, असे सुनील तटकरे म्हणाले. राजकारणाच्या पलीकडे आणि एका विशिष्ट बाबींच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे संबंध राहिले पाहिजेत. स्वर्गीय चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती रूजवली आहे, ते संस्कार आमच्या सर्वांवर झाले आहेत. याबाबत मला इतर काही जास्त बोलायचे नाही, असे सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



