
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विदर्भासह भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. शेती, सिंचन, औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी केलेल्या तरतुदींमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’. या योजनेअंतर्गत ३ सप्टेंबर २०२५ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेती पंपांच्या वीज बिलासाठी तब्बल २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्व विदर्भाच्या सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प यासाठीही अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे उर्वरित कालव्यांची कामे वेगाने पूर्ण होऊन शेवटच्या टोकापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे जिल्ह्याला ‘स्टील कॉरिडॉर’ चा भाग म्हणून विकसित करण्याचा निर्णय. या प्रकल्पामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे उभारले जाण्याची शक्यता असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयात ट्रॉमा सेंटर उभारण्याची तसेच गंभीर आजारांच्या निदानासाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्याची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्येही लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या नशिबी गाजर भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे, पण महायुतीच्या अर्थसंकल्पात या जिल्ह्याच्या नशिबी केवळ ‘गाजर’ आले आहे. सरसकट कर्जमाफीचा पत्ता नाही आणि धानाला बोनसची हमी नाही! हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी दिली. बळीराजाच्या कल्याणाचा खऱ्या अर्थाने विचार करणारा अर्थसंकल्प आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो सामान्य जनतेच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणारा आहे. दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक आश्वासक पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे आमदार डॉ. परीणय फुके यांनी दिली. वंचितांना न्याय देण्यात सरकार अपयशी ”हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या बाता आणि सामान्य माणूस अनवाणी’ अशा स्वरूपाचा आहे. वंचितांना न्याय देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” असे भंडारा – गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



