
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. “अशोक खरातचे १०० नव्हे तर २०० व्हिडिओ असून त्यातील ९० व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह आहेत,” असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून उद्या विधिमंडळात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “ज्यांच्या हातात जनतेने विकासाची दोरी दिली, ते आज भोंदूबाबासोबत ज्योतिषाची दोरी ओढत आहेत. अशा प्रकारची भोंदूगिरी जोपासण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. या २०० व्हिडिओंमध्ये अनेक मंत्री आणि आयएएस (IAS) दर्जाचे अधिकारी अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर या सर्व दोषींची तातडीने गच्छंती झाली पाहिजे,” अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. महिला असल्यानेच चाकणकरांना टार्गेट केले का? नाना पटोले यांनी या प्रकरणात लैंगिक भेदभावाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. “रूपाली चाकणकर महिला असल्याने त्यांना टार्गेट केले जात आहे का? ज्या मंत्र्यांचे फोटो आणि संबंध समोर आले आहेत, त्यांचे राजीनामे सरकार कधी घेणार?” असा सवाल पटोले यांनी विचारला. मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांचाही यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. तो’ पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांनी का लपवला? नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मागच्या अधिवेशनात मी नाशिकच्या एका मुद्द्यावर विधानसभेत एक पेनड्राईव्ह दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तो का लपवून ठेवला? जर तेव्हाच कारवाई झाली असती, तर आज महाराष्ट्र इतका बदनाम झाला नसता. अशोक खरात प्रकरणात कोणत्याही मागणीशिवाय सरकारने तातडीने एसआयटी (SIT) का स्थापन केली? हे प्रकरण दाबण्यासाठी तर हा प्रयत्न नाही ना?” अशी शंका नाना पटोले यांनी व्यक्त केली. उद्या सभागृहात रणकंदन होण्याची चिन्हे उद्या विधानसभेत या प्रकरणी ‘स्थगन प्रस्ताव’ आणून सरकारकडून सविस्तर खुलासा मागणार असल्याचे नान पटोले यांनी स्पष्ट केले. “कुंभमेळ्याच्या भूमीत असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. गरज पडल्यास या नैतिक जबाबदारीवरून आम्ही सरकारचा राजीनामा मागू,” असा थेट इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. अधिकारीच खरातला वाचवायचा प्रयत्न करताहेत दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अशोक खरात प्रकरणावरून अनेक मोठे दावे केलेत. राज्य सरकारमधील उच्च पदावर बसलेले अधिकारीच लिंगपिसाट अशोक खरातला वाचवायचा प्रयत्न करत आहेत, सर्व कायदेशीर मदत करत आहेत अशी माहिती समोर येत असल्याचे सपकाळ म्हणाले. तसेच त्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीची महाराष्ट्राचा एपस्टीन अशोक खरातच्या पत्नीबरोबर जमिनीत भागीदारी असल्याची ही माहिती असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. राज्य शासनातील अधिकारी असलेल्या व्यक्तिच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स, स्टार्टअप…आणि भोंदू बाबा अशोक खरात सोबत उघड भागीदारी. सत्तेत बसलेल्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य तरी आहे का? यांनी कागदपत्रांमध्ये दिलेला पत्ता ही ठाण्याचा आहे, हा खरंतर योगायोगच म्हणावा लागेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



