
पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत. किरकोळ कारणावरून कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांचा प्रकार उघडकीस आला आहे. “आम्हीच इथले भाई” असे म्हणत तरुणांच्या जमावाने तब्बल 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
.
या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगात सुरू आहे. वारंवार अशा घटनांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणांच्या अपयशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नेमके काय घडले?
पुण्यातील भवानी पेठ परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या दहशतीचा प्रकार समोर आला असून, शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या काही तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेऊन थेट रस्त्यावर उतरून हिंसाचार घडवून आणला.
या हल्लेखोर तरुणांनी 10 ते 12 दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये हे तरुण “आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये” असा इशारा देत दहशत माजवत असल्याचे दिसून येते.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भवानी पेठ येथील कोयता गँग प्रकरणात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, काही तासांतच या वादाने हिंसक वळण घेतले. मध्यरात्रीच्या सुमारास, काही तरुणांनी जमाव तयार करून हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण केली.
या तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर जोरदार हल्ला चढवून तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे भवानी पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी औंधमध्येही कोयता गॅंगने केला होता हल्ला
औंध परिसरात घडलेल्या कोयता गँग हल्ल्याच्या प्रकारात काही दिवसांपूर्वी चतु:शृंगी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. 28 जून रोजी रात्री 12.15 वाजता, सात जणांच्या टोळीने काही तरुणांवर कोयत्याने आणि काठ्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
पोलिसांनी या प्रकरणी सातही आरोपींना अटक केली असून, त्यांची धिंड काढत कडक संदेश दिला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि तीन लोखंडी कोयते जप्त केले आहेत. ही तातडीने केलेली कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरली असून, नागरिकांनी याचे स्वागत केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.