
Nitesh Rane On Raj Thackeray: मुंबईत अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या कार्यक्रमात सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक हिंदू आहे, असे विधान नितेश राणेंनी केलंय. त्यांनी या विधानामागचं कारणंही सांगितलं.
उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड
नितेश राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हिंदू असण्यावरच प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची तपासणी करावी लागेल. सलमान खानने संघाच्या कार्यक्रमात जाण्याचे साहस दाखवले, पण उद्धव ठाकरेंनी असे कधीच केले नाही. तसेच राहुल गांधींच्या समोर उद्धव आपल्या वडिलांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी वारंवार एकसारखे बोलण्यात पीएचडी घेतली असती, पण बौद्धिक विकास केला असता तर इतके कार्यकर्ते पक्ष सोडून गेले नसते, असा टोमणा त्यांनी मारला.
राज ठाकरेंना लगावला टोला
राज ठाकरेंनी संघाच्या कार्यक्रमावर टीका केल्यावर नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राज ठाकरेंना कार्यक्रमाबाबत चुकीची माहिती मिळाली आहे. जर राज ठाकरेंनी या कार्यक्रमात भाग घेतला असता तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले असते. राज ठाकरे मुस्लिम नेत्यांबाबत गप्प बसतात पण हिंदू आणि हिंदुत्वावर बोलून पाकिस्तानातील लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका नितेश राणेंनी केली.
निवडणूक निकालांवर काय म्हणाले?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशाबाबत नितेश राणेंनी विधान केलंय. महायुतीला पहिल्या क्रमांकावर राहण्याची सवय झालीय. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही महायुती मजबूत राहिलीय. कोकण हा भाग भाजप आणि महायुतीचा मजबूत गड आहे. सिंधुदुर्गात ठाकरे गटाला फक्त नामधारी ठेवलंय. जनतेने विश्वास दाखवला असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करू, असे त्यांनी सांगितले. हिंदुत्वविरोधी धोरणांना जनतेने नाकारले, हे यशाचे कारण असल्याचे नितेश राणे म्हणाले.
केशव उपाध्येंचे प्रत्युत्तर
सरकारी भीतीमुळे मोहन भागवत यांच्या रटाळ कार्यक्रमाला लोक आले, असे राज ठाकरे म्हणतात.राज ठाकरे यांनी या गैरसमजातून बाहेर यायला हवे. ज्या पद्धतीने मनसेच्या खळखट्याकच्या भीतीने लोक येतात, तसंच इतरत्रही होत असावं, असा समज करून घेणं चुकीचं आहे. संघाच्या कार्यक्रमांना लोक शिस्तीने, स्वेच्छेने येतात. संघाच्या शाखा, संचलन आणि बहुतांश कार्यक्रम हे पहाटे किंवा सकाळी होत असतात. त्यामुळे ते आपल्याला दिसत नसतील, असे केशव उपाध्ये म्हणाले. संघ शंभर वर्षे वाटचाल करून समाजमान्य झाला, तुमच्यासारखे स्वार्थी राजकीय पक्ष दोनचार दशकांतच संपले. याचा आधी विचार करा, अशी बोचरी टीका केशव उपाध्येंनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



