
Mumbai News : हिंदीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मैदानात उतरणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदीविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरेंनी एकत्र मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठाकरेंच्या शिवसेनेनं मान्य केलाय. त्यामुळे जवळपास दोन दशकांनंतर दोन्ही बंधू एकत्र दिसणार आहेत.
हिंदीविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी लादू देणार नसल्याची भूमिका राज आणि उद्धव ठाकरेंनी घेतलीय. राज्य सरकारच्या पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या याच निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरणार आहेत. 5 जुलैला राज ठाकरेंनी हिंदीविरोधात मोर्चाचं आयोजन केलं असून या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच भूमिकेखाली जवळपास दोन दशकानंतर एकत्र येणार आहेत.
सोशल मीडियावरुन ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेची इनसाईड स्टोरी सांगितली. काल राज ठाकरेंचा फोन आला होता, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. मराठीसाठी लढतोय म्हणून आम्हाला तुरुगांत टाकतील अशी भीती देखील संजय राऊतांनी व्यक्त केलीय. तर मराठीच्या मुद्द्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी असल्याचं वक्तव्य मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलंय.
ठाकरे बंधूंनी हिंदीविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मराठीच्या मुद्दावर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं काही नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. तर राज ठाकरे गर्दी जमवणार त्यामुळे उद्धव ठाकरे राजकीय फायद्यासाठी जाणार असल्याचा टोला उदय सामंतांनी लगावला आहे.राष्ट्रवादी एसपीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील हिंदीविरोधात भूमिका घेतलीय. त्यामुळे ते देखील या मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, यावर स्वता शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. मनसेचं धोरण समजून मोर्चात सहभागी होऊ असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.
ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव ज्या नावाभोवती महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण घोंगावत असतं. राजकीय मतभेदामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पडली. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी गेल्या दोन दशकापासून संपूर्ण महाराष्ट्र आतूर आहे. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेचं हे स्वप्न आता साकार होणार आहे. कारण येत्या 5 जुलैला हिंदीविरोधातल्या लढ्यात, मराठी माणसांचं आणि मराठीच्या पुरस्कारासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.