
Cough Syrup Deaths In Nagpur: देशभरातील तीन प्रमुख राज्यांमध्ये कफ सिरपमुळे 18 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच नागपूरमध्येही यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित मेंदूज्वराचे (एइएस) म्हणजेच Acute Encephalitis Syndrome आणि संशयित कफ सिरपमुळे नागपुरात मध्य ऑगस्टपासून आतापर्यंत एकूण तब्बल 19 रुग्णांचे मृत्यू झाले असून त्यापैकी 13 रुग्ण मध्य प्रदेशातील आणि 6 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. रुग्णांचा वयोगट 0 ते 16 वर्षे असल्याची माहिती नागपूर महानगर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांनी दिली आहे. आज नागपूरच्या विविध रुग्णालयात एकूण 12 रुग्ण दाखल आहेत.
महाराष्ट्रातील रुग्णांमध्ये ती लक्षणं नाहीत
यावर्षी ऑगस्टपासून हे रुग्ण येण्यास सुरुवात झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील 13 रुग्ण हे संशयित कफ सिरपमुळे असल्याचा संशय आहे. या सर्वांना लघवी करताना त्रास होणे, किडनी फेल्युअर आणि मेंदूला सूज अशी लक्षणे होती. महाराष्ट्रातील रुग्णांना ही लक्षणे नव्हती, हे विशेष असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
एकूण रुग्णांची संख्या किती?
दोन्ही समस्या असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 36 इतकी असून त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 13 मृत्यू मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून आलेल्या रुग्णांचा आहे. तर सिवनी येथील एका रुग्णालयाचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्याची स्थिती काय?
सद्यस्थितीत नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये 0 ते 16 वर्ष वयोगटातील संशयित मेंदूज्वराचे (एइएस) एकूण 12 रुग्ण विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये भरती आहेत. यातील मध्यप्रदेशातील 10 व महाराष्ट्रातील 1 आणि तेलंगणाचा 1 रुग्ण आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये 6 रुग्ण उपचार घेत आहेत. एम्समध्ये 2 रुग्ण, न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण, कलर्स हॉस्पिटलमध्ये 1 आणि गेट वेल हॉस्पिटल 1 रुग्ण उपचार घेत आहेत.
पथकाकडून पहाणी
वैद्यकीय शिक्षण विभागाचे 3 सदस्यीय पथकाने तपासणीस सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक नागपूर आणि पुढे छिंदवाड्यालाही भेटीची शक्यता आहे. या मृत्यूंसंदर्भातील अंतिम निर्णयासाठी ICMR ,NIV चे रिपार्ट महत्त्वाचे ठरणार आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची तीन राज्यांना नोटीस
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारांना नोटीस बजावल्या आहेत. बनावट खोकल्याच्या सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बनावट औषधांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.