
सुदर्शन खिल्लारे, झी २४तास, नाशिक: एकीकडे कांद्याला भाव नाही दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची इकडे आड-तिकडे विहीर अशी अवस्था झालीये. बदलतं हवामान आणि सततचा पाऊस यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे 50 टक्के कांदा शेतातच खराब झाला. त्यातून उरलेला कांदा भाव वाढेल या आशेनं शेतक-याने चाळीत साठवून ठेवला.मात्र चाळीत साठवलेला कांदाही सडून खराब होऊ लागलाय.
नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकरी तर अक्षरश: रडकुंडीला आलाय. कष्टानं घाम गाळून जो कांदा पिकवला तो जनावरंही खावू शकत नाहीत अशा अवस्थेत आहे. बालाजी साहेबराव गुंड या शेतक-यावर 500 क्विंटल कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आलीये.
कोसळता बाजारभाव आणि त्यात अस्मानी संकट यामुळे शेतक-याचं गणित पूर्णपणे कोलमडलंय. या संकटात सरकारने मदतीचा हात पुढे करावा अशी शेतकरी आस लावून बसलेत.
देशातील एकूण कांदा उत्पादनात राज्याचा वाटा 55 टक्के इतका आहे. मात्र अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत येतोय. त्यात नाफेड आणि NCCFकडून कांदा खरेदीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलाय. यासंदर्भात त्यांनी पणनमंत्र्यांशीही चर्चा केलीये.
सततच्या संकटांमुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. कधी अस्मानी संकट, कधी सरकारी धोरण यामुळे कांदा उत्पादकांवरील संकटं कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. आता शेतक-यांवर आलेल्या संकटात सरकार कशी मदत करणार हे पाहावं लागणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.