
CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Demise : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. मात्र आपण एक कर्तबगार सहकारी गमावला हीच भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्यक्त केली. अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना आपल्याला असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल असं कधीही वाटलं नव्हतं, असं म्हणत फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलंय
कधीही सभागृहाचत नजर फिरवली, तर अजित पवार त्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसायचे. कितीही काळ सभागृह चालले तरी ते तिथं असायचे मात्र आज ते नाहीत याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढच्या वर्षी तेरावा अर्थसंकल्प मांडून त्यांनी शेषराव वानखेडेंचा विक्रम मोडला असता असं सांगत अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी पार पडेलल्या जबाबदारीकडे त्यांनी लक्ष वेधलं. कठोर निर्णय घेण्यासाठी मागेपुढे न पाहणारे नेते म्हणून अजित पवारांची ओळख असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहिण योजनेचा पुनर्विचार करावा असं सांगून त्यांनी तो प्रस्ताव मंत्रिमंडळात आणला होता असं म्हणत त्यांनी आपल्य़ा या विधानासा सउदाहरण सभागृहापुढे मांडलं.
‘मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात अंतस्थ आत्म्यालाही जाळतो’
महाकवी भास यांच्या एका नाटकातील संस्कृत श्लोकाचं उदाहरण देत, लाकूड जळतं तेव्हा ती अग्नी केवळ शरीर जाळतो. मात्र, मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांसारख्या सच्चा मित्राचा, सहप्रवाशाचा असा मृत्यू होणं ही केवळ राजकीय हानी नाही तर सर्वांच्या अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. कितीही काळ गेला तरी काही वेदना कमी होत नाही, अशा प्रकारची ही वेदना असणार आहे या शब्दांत चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘मृत्यू हीच विश्रांती…’
अजित पवारांसारखा एक व्यक्ती, ज्यानं राजकीय क्षेत्रात आपलं अस्तित्वं, नेतृत्वं निर्माण केलं आहे, ज्यांच्याकडे समाज आणि क्षेत्र भविष्याच्या दृष्टीकोनातून पाहतं असा व्यक्ती जेव्हा निघून जातो तेव्हा खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली या शब्दाची व्याख्या लक्षात येतं असं म्हणताना असे अजित दादा दुसरे होवू शकत नाही, असं फडणवीस, म्हणाले. मंत्रिमंडळ बैठका, प्रचार, जाहीर कार्यक्रम आणि अधिवेशन सुरू झाल्यावर अजित पवारांचं अस्तित्वं सगळीकडे जाणवायचं असं सांगताना, ”प्रत्येक गोष्ट शिस्तीत झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचं. ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती…’ हे काव्यवचन अजित पवारांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला सत्य भासतं. कारण, अखंड जीवनात कार्यमग्न असणारे अजित पवार प्रत्येक क्षणाचा व्यवस्थित उपयोग करणारे अजितदादा, कोणतीही गोष्ट नियोजन केल्याशिवाय न करणारे अजित पवार या सर्व गोष्टी राजकारणात फार विरळ असल्याचं पाहायला मिळतं”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कैक पैलू मांडले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



