
Maharashtra Weather News : अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात सक्रिय असणाऱ्या आणि काही अंशी महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या (Cyclone Shakti) ‘शक्ती’ चक्रीवादळाची प्रणाली आता विरली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार वादळाचं सावट आता माघारी गेलं असलं तरीही पावसाचं सावट मात्र राज्यावर कायम असून अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची प्रणाली मात्र सक्रिय असल्यानं राज्याच्या काही भागांमध्ये अधूनमधून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रावर पावसाच्या ढगांचं सावट पाहायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग इथं पावसाच्या सरी आणि अधूनमधून विजांचा कडकडाटसुद्धा होण्याची शक्यता असल्यानं या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रायगड, रत्नागिरी, नाशिकमधील घाटमाथा, पुणे, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची हजेरी असेल. तर, उर्वरित महाराष्ट्रात तापमानवाढीसह लख्ख सूर्यप्रकाश अशीच स्थिती पाहायला मिळेल.
वाऱ्याची दिशा आणि वेग पाहता मध्येच या सूर्यावर पावसाळी ढगांचं सावटसुद्धा येणार असल्यानं या बदलत्या हवामानाचा नेम लागणं मात्र येत्या काळात कठीण होणार आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, तुरळक भागांमध्ये पावसाच्या सरी दणाणून सोडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये शीतलहरी…
हिमालयाकडून येणाऱ्या शीत वायूलहरींमुळं उत्तर भारतात तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या केदारनाथ धाम इथं गेल्या 24 तासांपासून सातत्यानं बर्फवृष्टी सुरू असून, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. फक्त केदारनाथ नव्हे, तर हिमाचल आणि काश्मीरच्या पर्वतीय भागांमध्येसुद्धा हिमवृष्टीला सुरुवात झाल्यानं या हवामानाचा आता मध्य भारतापर्यंत नेमका कसा परिणाम दिसतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
FAQ
चक्रीवादळ ‘शक्ती’ची सद्यस्थिती काय आहे?
अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात सक्रिय असलेल्या चक्रीवादळ ‘शक्ती’ची प्रणाली आता विरली आहे. हवामान विभागानुसार, वादळाचा धोका कमी झाला असला तरी अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अधूनमधून पाऊस आणि वीज कोसळण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात हवामान कसे असेल?
पश्चिम महाराष्ट्रावर मुख्यतः ढगाळ हवामान राहील. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे पावसाच्या सरी आणि वीज कोसळण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी आहे.
कोणत्या भागांमध्ये यलो अलर्ट आहे?
उत्तर: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी अधूनमधून वीज कोसळण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.