
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा लढा आरक्षाचा नव्हे तर राजकीय अजेंडा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणाचा नाही. हा लढा एक राजकी अजेंडा आहे. यात विरोधी पक्षांसह काही राजकीय पक्षांच्याही काही नेत्यांचा समावेश आहे
.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त आरोप केला आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे यांचा लढा हा आरक्षणाचा नाही. मीडियाद्वारे मराठा बांधवांच्या शिक्षण व नोकरीचा जो कळवळा दाखवला जात आहे, हे तसे नाही. मनोज जरांगे यांनी मुंबईकडे निघतानाच हा राजकीय अजेंडा असल्याची आपली स्क्रिप्ट फोडली. हा राजकीय कसा? तर ते म्हणाले की, मी हे सरकार उलथावून लावणार आहे. आम्ही आजपर्यंत यात विरोधी पक्ष सामिल असेल असे म्हणायचो. पण, आता मी जबाबदारीने सांगतो की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथावून लावण्यासाठी जसे विरोधी पक्षांचे आमदार खासदार त्यात सामिल आहेत, तसे अजित पवारांचे आमदारही आमदार, खासदार त्यात सामील आहेत. मी हे जबाबदारीने सांगत आहे. मी माझ्या पदरचे सांगत नाही. मला राजकीय भानगडीत पडायचे नाही.
जरांगेंच्या माध्यमातून सरकार बदलण्याचा प्रयत्न
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून या महाराष्ट्रातील आमदार, खासदार सरकार अस्वस्थ करण्याचा व बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी आरक्षण हा विषय नाही. त्यामुळे माझी मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की, जरांगेंची ही मागणी मान्य केली तर महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचे आरक्षण संपलेले असेल. कारण, ओबीसी आरक्षण हे शासनकर्त्या व राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण करण्यासाठी आहे. ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांगडे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचे काय होईल? याची कल्पना इथल्या आमदार, खासदार, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते यांना नाही.
आमच्यावर गुन्हे, जरांगेंना रेड कार्पेट
नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या लेटरहेडवर मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला आहे. तुम्हाला ओबीसींचे आरक्षण संपवायचे आहे का? तुमच्या स्पर्धेत इथला ओबीसी टीकेल का? हे सर्व प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. हे बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. लक्ष्मण हाके कोणतेही निर्बंध नसताना गेवराईत गेला तर त्याच्यावर एफआयआर दाखल केला जातो. पण जरांगे यांना मात्र रेड कार्पेट दिले जाते. खऱ्या अर्थाने गुन्हे दाखल करण्यातही सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होत आहे, असे आरोपही हाके यांनी यावेळी बोलताना केला.
पत्रकारांनी यावेळी त्यांना सत्ताधारी आमदार कशासाठी सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करतील? असा प्रश्न केला. त्यावर हाके म्हणाले, हाच प्रश्न विजयसिंह पडिंत, रमेश सोळंकी यांना विचारला पाहिजे. हेच लोक जरांगे यांना इथपर्यंत येण्यासाठी गाड्याघोड्या पुरवत आहेत. हे ते जाहीरपणे करत आहेत. या सर्वपक्षीय लोकाचा ओबीसींचे आरक्षण संपवणे हा एकमेव अजेंडा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.