
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पश्चिम किनारपट्टीवरीव दोन्ही क्षेत्रात निर्माण कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे दक्षिण गुजरात ते दक्षिण कर्नाटकापर्यंत अरबी समुद्रकिनाऱ्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सततच्या पावसामुळं राज्यातील कमाल तापमानाच्या आकड्यात काही प्रमाणात घट झाल्याची नोंदसुद्धा करण्यात आली आहे.
मान्सून देशभरात सक्रिय झाल्या कारणानं राज्यात प्रामुख्यानं मध्य महाराष्ट्रासह विदर्भ पट्ट्यामध्येही पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर, कोकणातील किनारपट्टी भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच धर्तीवर कोकण, घाटमाथ्यावरील परिसर आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
विदर्भाला ऑरेंज अलर्ट
विदर्भात प्रामुख्यानं नागपूर, अमरावती,वर्धा,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत पावसाची ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया मध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर महाराष्ट्रातही कोसळधार
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शहर परिसरात पावसाचा जोर कायम असून दिवसभरात 31.1 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 10 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गोदावरी नदीला महापूर
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, सलग 17 दिवसांपासून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीची पूर परिस्थिती आहे. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी अहिल्यादेवी होळकर ब्रिज येथून रामकुंडात प्रवाहित झाले. नाशिकमध्ये दैनंदिन पूजा विधी, बाजारावर परिणाम दिसून आला.
राज्यात पुढील 48 तास पावसाचे…
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या धर्तीवर काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज असून, विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी
मुंबईपासून काहीशा अंतरावर असणाऱ्या किनारपट्टी भागात येणाऱ्या पालघर जिल्ह्यात हवामान खात्याकडून पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सध्याही ठिकठिकाणी पावसाचा जोर असल्याने पूरस्थिती निर्माण झालेली असल्यानं जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणं भरली असल्यानं सूर्या आणि वैतारणा नदीपात्रामध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ज्यामुळं पाणीपातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
वाशिम जिल्ह्यातही रविवारपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.