
मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी?’ त्यांचे राजकारण हे केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी
.
भाजप नेते मोहित कंबोज यांचा महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात कथितपणे सहभाग होता. त्यांनीच शिवसेनेतील फुटीवेळी बंडखोर आमदारांची गुवाहाटीमध्ये सोय केल्याचा आरोप केला जातो. पण त्यानंतरही ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज भाजपचा ब्रोकर
सुजात आंबेडकर एका पोस्टमध्ये म्हणाले, ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हात होता.
मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले?
मुंबईत 25 वर्षे सत्ता असताना मराठी माणूस आठवला नाही
ते पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे ‘केम छो वरली’ म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असताना यांना मराठी माणूस आठवला नाही.
6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान, असे सुजात आंबेडकर म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



