
विजयी मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी मराठीच्या मुद्यावर पुन्हा आक्रमक बाणा अवलंबण्याचा निश्चय केलाय. मराठीची आणि मराठी माणसाची गळचेपी होत असेल तर खुशाल कानाखाली वाजवा असा आदेशच राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलाय. तर मराठी माणूस त्याच्या हक्कासाठी भांडत असेल तर त्याला कोणी गुंडगिरी म्हणत असेल तर ती गुंडगिरी करणारच असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे एक घाव दोन तुकडे. कुणी आरे केलं तर त्याला कारे करणारी आक्रमक संघटना. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात थोडी मवाळ झाली होती. पण याच शिवसेनेनं आता कुस बदललीये. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी वरळीतल्या विजयी जल्लोष मेळाव्यातून पुन्हा शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिलाय. मराठीच्या मुद्यावर मराठी माणूस न्याय मागतो त्याला जर गुंडगिरी म्हणत असाल तर ती गुंडगिरी आम्ही करुच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.
मराठी माणूस आणि मराठी भाषा हा आपला अजेंडा असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मराठीचा अपमान करणा-यांच्या कानाखाली मारा असं आवाहन त्यांनी मनसैनिक आणि शिवसैनिकांना केलंय. पण मराठीविरोधकांना अद्दल घडवताना व्हिडिओ मात्र काढू नका असा सल्ला द्यायला ते विसरले नाहीत.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे दोघांनीही मनसैनिक आणि शिवसैनिकांना मराठीच्या मुद्यावर आक्रमक बाणा स्वीकारण्याचा स्पष्ट संदेश दिलाय. त्यामुळं यापुढच्या काळात मराठीच्या मुद्यावर शिवसैनिकांचा राडे पुन्हा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसेनंही मराठीच्या मुद्यावर केडियांचं ऑफिस फोडून एक चुणूक दाखवलीय. त्यामुळं येत्या काळात शिवसैनिकांचा राडा आणि मनसैनिकांचं खळ्ळखट्याक पाहण्याची मानसिकता निर्माण करावी लागेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.