
Swami Avimukteshwaranand: महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून तीव्र वाद सुरू आहे. हा वाद आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर तीव्र झाला असून, यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आणि हिंदीच्या कथित सक्तीविरोधात विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. हा वाद प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात अनिवार्य करण्याच्या निर्णयापासून सुरू झाला. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी तीव्र विरोध केला. हा निर्णय मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि राजकीय अस्मितेला धक्का लावणारा असल्याचे ठाकरे बंधुंनी म्हटलं. यात आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विधान केलंय. ज्याची देशभरात चर्चा होतेय.
ठाकरे मूळचे बिहारचे
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महाराष्ट्रातील मराठी-हिंदी भाषावाद आणि ठाकरे कुटुंबाबाबत विधाने केली आहेत. ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलंय. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे कुटुंबाच्या मराठी अस्मितेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘ठाकरे हे महाराष्ट्रातील मूळ रहिवासी नाहीत, ते मगध (बिहार) येथून आले आहेत, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
हिंदीविरोध हा केवळ राजकीय स्वार्थासाठी
महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला असतानाच स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे हे विधान आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हिंदीविरोध हा केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे, आणि यामुळे मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये फूट पडण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.मराठी अस्मितेच्या नावाखाली हिंदीविरोधी आंदोलन सुरु असून मराठी अस्मिता हा एक वेगळा मुद्दा आहे. पण हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा ठाकरे बंधूंचा खरा उद्देश नाही, असे ते म्हणाले. हा वाद राजकीय हेतूंसाठी उभा केला गेलाय आणि यामागे पालिका निवडणूक आणि महाराष्ट्रातील सत्तेची लालसा दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
‘ठाकरेंनी मला मराठी शिकवावी’
मी 2 महिने मुंबईत असणार आहे. यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांनी मला मराठी शिकवावी. मी मराठी शिकू इच्छित असल्याचे ते म्हणाले. तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात मराठी शिकवेन. 2 महिन्यानंतर मी जेव्हा इथून जाईन, तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
फडणवीस सरकारवर नाराजी
महाराष्ट्रातील संतांचं ज्ञान हे मराठीत आहे, मी ते ज्ञान ग्रहण करू इच्छित असल्याचे अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या एकनाथ शिंदे सरकारने गाईंना राज्यमातेचा दर्जा देत सन्मान केला. मात्र, सध्याच्या सरकारने कुठलाही प्रोटोकॉल बनवला नाही, असे म्हणत त्यांनी फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली.
माझी जीवनगाथामध्ये काय म्हटलंय?
केशव ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार, महापद्मनंदांच्या कारकिर्दीत त्यांच्या जातीचे लोक मगधमध्ये राहत होते. पण नंद राजवंशानंतर राजांच्या अत्याचारांना कंटाळून ते मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात आले आणि स्थायिक झाले. केशव ठाकरे हे चंद्रसेनीय कायस्थ प्रभु जातीचे आहेत. जी महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या समतुल्य मानली जाते. किंवा ती त्यांच्या नंतरची सर्वात प्रगत जात मानली गेली. या समुदायाला बिहारच्या कायस्थांची उप-जात म्हणून पाहिले जाते. कारण ते कायस्थ जातीच्या लोकांप्रमाणेच प्रशासकीय कामात भाग घेतात. असे असले तरी ठाकरे कुटुंबाचा बिहारशी थेट संबंध नाही. त्यांचे पूर्वज तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले आणि या ठिकाणाच्या संस्कृतीत ते रुजले आहेत.चंद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा मगध ते महाराष्ट्र असा प्रवास चंद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या लोकांनी मगध ते महाराष्ट्र या प्रवासात खूप मोठा पल्ला गाठला. मराठी इतिहासकार व्ही.के. राजवाडे आणि जी.एस. सरदेसाई हे देखील मानतात की, चंद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) हे क्षत्रिय-प्रशासकीय वर्गाचे लोक आहेत ज्यांचे मूळ उत्तर भारत मगध किंवा उज्जैनचे असल्याचे ते मानतात. केशव ठाकरे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, त्यांच्या कुटुंबाचे पूर्वज मराठा राजवटीत धोडप किल्ल्याचे किल्लादार म्हणून काम करत होते. त्यांचे पणजोबा कृष्णाजी माधव धोडपकर पाली, रायगड येथे राहत होते, तर त्यांचे आजोबा रामचंद्र ‘भिकोबा’ धोडपकर पनवेल येथे स्थायिक झाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.