
Maharashtra Politics BJP Vs Eknath Shinde? वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेतल्यानंतर आता गणेश नाईकांनी ठाणे जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. गणेश नाईकांनी पालघरमध्ये जनता दरबार घेत एकनाथ शिंदेंना इशारा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पाहूयात यासंदर्भातला आमचा हा रिपोर्ट
जनता दरबारचा सपाटा
ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंसमोर भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आव्हान उभं करु पाहयातायेत. गणेश नाईकांची मंत्रीमंडळात एंट्री झाल्याच्या दिवसापासून त्यांचं ठाणे शहरातल्या राजकारणावर बारिक लक्ष असल्याचं पाहायला मिळालं. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घेतला. एवढ्यावरच गणेश नाईक थांबले नाहीत. त्यांनी शेजारच्या पालघरमध्येही जनता दरबार घेण्याचा सपाटा लावलाय. जनतेच्या वेदनांवर फुंकर मारण्यासाठी जनता दरबार घेतल्याचा दावा गणेश नाईकांनी केलाय.
भाईगिरीचा उल्लेख करत सूचक विधान
गणेश नाईकांनी ठाणे जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय. या संदर्भात गणेश नाईकांनी जो भाईगिरी हा शब्दप्रयोग वापरल्यानं सगळ्यांचेच कान टवकारलेत. “तीन ते पाच ही वेळ आज भाजपच्या मुख्यालयात जनता दरबारसाठी देण्यात आलेली होती. परंतु अपेक्षित नागरिकांपेक्षाही जास्त लोक या ठिकाणी जनता दरबारात उपस्थित होते. वसई, विरार, पालघर, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा, वाडा या ठिकाणाहून आलेल्या अनेक लोक होते ज्यांच्या वन जमिनीचा विषय होता. जनता दरबार रुटीन कार्यक्रम आहे त्यामुळे निवडणुका बघून ते करत नाही. लोकांच्या वेदना या ठिकाणी ऐकून ऐकून घेतो आणि त्या मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. हिंसा ही फक्त एकाच शहरात नसते. महाराष्ट्रामध्ये आज इथे परिस्थिती योग्य आहे तर दुसऱ्या क्षणाला काय होईल हे शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. राजकीय वर्गातून असा प्रकार घडू नये त्यामुळे निश्चितपणे प्रशासक सतर्क आहेत. ठाण्यातून भाईगिरी आपोआपच हटणार आहे. अंधार हटवण्याची गरज नसते त्याठिकाणी उजेड गेल्यावरती अंधार आपोआप हटतो,” असं गणेश नाईक यांनी जनता दरबारानंतर म्हटलं. गणेश नाईकांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवली जात आहे.
ठाण्यातही शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे भाजपचे मनसुबे
पुढच्या शंभर दिवसांत ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. नवी मुंबईत गणेश नाईकांची सत्ता आहेच पण ठाण्यातही शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. ठाणे महापालिकेच्या मोहिमेसाठी गणेश नाईक आरोपांचा दारुगोळा साठवत नाही ना अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरु झालीये.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.