
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकरणावर शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मयूरी हगवणेची तक्रार महिला आयोगाने गांभीर्या
.
ज्योती मेटे म्हणाल्या, महाराष्ट्रातील समाजमन हे वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने ढवळून निघाला आहे. तिच्या पालकांच्या मते तिला या आत्महत्येस प्रवृत्त केले गेले. पोलिस तपासात यथावकाश निष्पन्न होईल ही आत्महत्या आहे की हत्या आहे किंवा तिला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले. परंतु या निमित्ताने माध्यमांद्वारे ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्यावर विचार करायला लावणाऱ्या आहेत.
वैष्णवीच्या आत्महत्येला लालसा कारणीभूत
पुढे बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, तिच्या वडिलांनी सांगितले की तिच्या लग्नात फार मोठी रक्कम सोन्याच्या रूपात दिलेले आहे त्यानंतर एक फॉर्च्यूनर गाडी दिलेली आहे, चांदीची भांडी दिलेली आहेत. थाटामाटात लग्न लाऊन दिले आहे. थोडक्यात एका अर्थाने या हुंडा प्रथेचे उदात्तीकरण आम्ही माध्यमांद्वारे सगळ्यांनी अनुभवले. मग वैष्णवीच्या आत्महत्येला किंवा तिच्या सासरच्या लोकांच्या वर्तनाला हा हुंडा किंवा ती लालसा जी आहे ती कारणीभूत होती, असे आपल्याला समजले पाहिजे.
या घटनांच्या तपशीलाशी जाणे गरजेचे
वैष्णवीच्या मारेकऱ्यांना किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आक्रोश झाला. आणि ही चांगली बाब आपल्याला म्हणता येईल की पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी यामध्ये गांभीर्याने दखल घेतली. दोषींवर कडक कारवाईचे सुतोवाच केले आणि त्यानुसार पोलिस यंत्रणाही हलली. परंतु या घटनांच्या तपशीलाशी जाणे आपल्याला गरजेचे आहे. म्हणजे अशा घटना वारंवार घडणार यासाठी उपाययोजना काय करता येईल हे आपण एकत्र येऊन ठरवले पाहिजे, असे ज्योती मेटे म्हणाल्या.
हुंडा पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या
वैष्णवीचे एक प्रकरण उघडकीस आले म्हणून आपल्याला ते कळत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असताना देखील कोणी हुंडा देत आहे, मागत आहे किंवा ती चर्चाही होते. या बाबी खरोखरच आपल्याला लांछनास्पद आहेत. ही घटना उघडकीस अली म्हणून आपल्याला समजली. ग्रामीण भागात एक कोकण विभाग जर वगळला तर सगळीकडेच आपल्याला थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आढळून येईल. मी म्हणेल की हुंडा पद्धती किंवा हुंडाबळी ही एकमेव बाब नाहीये तर मी त्याचा काही अंशाने संबंध शेतकरी आत्महत्येशीही आहे हे मी आपल्याला सांगू इच्छिते.
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात
ज्योती मेटे म्हणाल्या, जानेवारी ते एप्रिल 2025 च्या कालावधीत शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जर आपण बघितली तर महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात झालेल्या आहेत. त्यातही बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. यात अनेक गोष्टी आल्या जसे की पिकांचे नुकसान इत्यादी. परंतु यातील हिडन फॅक्टर हा आहे की मुलींच्या लग्नात केलेला अवास्तव खर्च. भव्य दिव्य विवाह सोहळे आणि काही अंशाने हुंडा पद्धत. या बाबींचा शेतकरी आत्महत्येशी संबंध आहे. यावर आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे.
पुढे बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, जेव्हा लोकनेते विनायक मेटे आणि माझा विवाह, आम्ही 1989 साली सामूहिक विवाहात केला होता. उद्देश एकच होता की हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा. बीडमध्ये अनेक वर्ष सामूहिक विवाहसोहळा करण्याची परंपरा विनायक मेटे साहेबांनी ठेवली होती. याचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण होणे गरजेचे आहे. कोकणात मी आवर्जून सांगेल की तिथे दोन्ही कुटुंबाकडून लग्नाचा खर्च वाटून घेण्याची पद्धत आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा हुंडा हा वर पित्याकडून वधू पित्याकडून स्वीकारला जात नाही. आधुनिक काळात जेव्हा मुलगी मुलांएवढीच शिक्षित होत आहे. प्रसंगी कमावतही आहे. एक चांगला समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण कार्य केले पाहिजे.
महिला आयोगाने मयूरीची तक्रार गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती
मयूरी हगवणे यांनी केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली नाही. यावर बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, मयूरी हगवणे यांनी महिला आयोगाकडे केलेली तक्रार आणि त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच सांगितले की त्यांची तक्रार आम्ही एका पोलिस स्टेशनला पाठवली होती. परंतु नंतर काय? आयोग एक सांविधानिक पद आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या तक्रारींचा जोपर्यंत निपटारा होत नाही तोपर्यंत मग त्या आयोगाच्या असण्याला काही महत्त्वच उरत नाही. त्यामुळे मयूरी हगवणेच्या तक्रारीवर महिला आयोगाने त्वरित आणि योग्य ती कारवाई झाली असती तर निश्चितच वैष्णवी हगवणेचा मृत्यू किंवा आत्महत्या टळली असती.
महाराष्ट्रात एवढे चांगले चांगले कायदे आहेत परंतु नुसते कायदे असून भागत नाही. तर त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तितकीच तटस्थ आणि निष्पक्ष असणे गरजेचे आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत या कायद्यांना काही अर्थ राहत नाही. जोपर्यंत समाज जागरूक होऊन यात काम करत नाही तोपर्यंत या अशा घटना घडतच राहणार आहेत, असेही ज्योती मेटे म्हणाल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.