
अभिषेकत आदेप्पा, सोलापूर, झी 24 तास : सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्या लेटेस्ट वक्तव्याने… मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते असं विधान त्यांनी सोलापुरातल्या एका कार्यक्रमात केलं.
शहाजीबापू पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपल्या निवडून येण्याचा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा योगायोग कसा राहिलाय याचा पाढाच त्यांनी भाषणात वाचला.
इतकं बोलून थांबतील ते शहाजीबापू कसले.. मधला काही काळ ते काँग्रेसवासी झाले होते. मात्र त्यावरुनही त्यांनी कोपरखळ्या मारल्या. शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाटांनीही पाटलांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर सांगोल्या माजी आमदार शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत आले ते गुवाहाटीतल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीत पोहोचल्यावर आपल्या कार्यकर्त्याला त्यांनी फोनवरुन तिथला अनुभव सांगितला. काय झाडी काय डोंगार असं म्हणणारे शहाजी पाटील बघता बघता महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले. नंतर एकनाथ शिंदेंनीही शहाजी पाटलांकडून तो डायलॉग पुन्हा म्हणायची विनंती केली होती.
आपल्या एका डायलॉगनं प्रसिद्धीच्या झोतात आलेले शहाजीबापू पाटील यांचा करिश्मा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चालला नाही. त्यांना शेकापच्या बाबासाहेब देशमुखांकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र आपण आमदार झालो असतो तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री झाले असते या त्यांच्या नव्या विधानानं पुन्हा चर्चा रंगलीय. आता हे विधान भाजपनं गांभीर्यानं घेतलं तर मात्र शहाजीबापू पाटलांचं काय होणार, याचे दबक्या आवाजात अंदाज बांधले जाऊ लागलेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.