
निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने उचललेला मतदार याद्यांवरील वाद आता सत्ताधारी महायुतीपर्यंत पोहोचला आहे. विरोधकांनी मतदार याद्यांतील घोळावर प्रश्न उपस्थित करत असतानाच, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना देखील याच
.
मतदार याद्यांमधील कथित घोळांवरून शनिवारी मुंबईत विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता. या ‘सत्याचा मोर्चा’मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही मतदारसंघातील दुबार आणि संशयित मतदारांची संख्या जाहीर करत निवडणूक आयोगावर थेट आरोप केले होते. एका बाजूला भाजपकडून महाविकास आघाडी-मनसेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच वेळी दुसरीकडे त्यांच्या मित्रपक्षानेही आता प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
शिंदे गटाचा दावा काय?
शिवसेना शिंदे गटाने नाशिकमधील मतदार याद्यांची आकडेवारी समोर ठेवत, महानगरातील मतदार यादीतून बोगस आणि दुबार मतदारांची नावे त्वरित वगळण्याची मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये अनेक दुबार नावे, बनावट नोंदी, अपूर्ण पत्ते, चुकीचे फोटो आणि कुटुंबातील सदस्यांचे नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेली असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी शिंदे गटाने मतदारसंघांनुसार दुबार मतदारांची संख्या जाहीर केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात : 86,239 दुबार मतदार
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात : 58,034 दुबार मतदार
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात : 93,574 दुबार मतदार
देवळाली-नाशिकरोड मतदारसंघात : 61,006 दुबार मतदार
या चारही मतदारसंघांमध्ये एकूण 2,98,853 संशयित मतदार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
मतदार यादी सुधारणेसाठी निवडणूक आयोगाला सूचना
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उद्देशून शिंदे गटाने मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्यामध्ये दुबार आणि मयत व्यक्तींची नावे तातडीने वगळणे, मतदारांची नावे योग्य मतदान केंद्रातच असल्याची खात्री करणे, ओळखपत्रावर फोटो स्पष्ट असणे अनिवार्य करणे आणि प्रत्येक मतदारासाठी बायोमॅट्रिक कार्ड बंधनकारक करून ते आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य करणे यासारख्या सुधारणा सुचवलेल्या आहेत. यामुळे केवळ विरोधी पक्षच नव्हे, तर सत्ताधारी आघाडीतील एका प्रमुख पक्षानेही मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाची मागणी केल्याने निवडणूक आयोगासमोरील आव्हान वाढले आहे.
दरम्यान, मतदार याद्यांवरील घोळामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. विरोधकांनी आयोगावर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला असताना, आता सत्ताधारी पक्षातीलच एक घटक याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत असल्याने राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



