
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पाहिले पाहिजे. ते अजूनही राष्ट्रीय पातळीवरील नेते झालेले नाही. राहुल गांधी हे देशातील नेते आहेत. कोण निवडणूक जिंकतो? यावर नेतृत्व ठरत नाही. बोगस मतदानाच्या माध्यमातून ते नेते झाले आहेत. त्यामुळे फडणवीस हे बोगस नेते
.
महाराष्ट्रात नवीन मतदारांच्या संख्येवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली होती. यात वाढलेल्या सर्व मतदारांनी भाजपलाच मतदान कसे केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांना राष्ट्रीय नेतृत्त्व करण्याची इच्छा असेल. मात्र, जो पर्यंत अमित शहा आहेत, तो पर्यंत त्यांना तशी संधी मिळणार नाही. अशा खोचक शब्दात राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात 39 लाख मतदारदारांचे काय होणार? याबाबत मी कालच वक्तव्य केले होते. यातील काही मतदार हे बिहारमध्ये स्थलांतरित होतील तर त्यातील काही दिल्लीत देखील आले होते. माझ्या कार्यकाळात दिल्ली काबीज करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असेल. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांचे मलोमिलन झाले असते तर चांगले झाले असते, अशी खदखद देखील त्यांनी व्यक्त केली. दोघांनी एकत्र निवडणुकीला सामोरे गेले असते तर चित्र वेगळे राहिले असते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू केला
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा प्रतिद्वंदी हा भाजप आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर भाजपला यश नक्कीच मिळाले नसते. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पॅटर्न बनवला असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला. त्यामुळे दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू केला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. हाच पॅटर्न आता बिहारमध्ये लागू केला जाईल, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांवर खटले दाखल केले आहेत. तसेच प्रमुख नेत्यांना जेलमध्ये टाकले. असाच पॅटर्न महाराष्ट्रात देखील राबवला गेला. आता तोच पॅटर्न दिल्लीमध्ये राबवला गेला. कदाचित बिहारमध्ये देखील हाच पॅटर्न लागू केला जाईल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.
प्रमुख नेतृत्वालाच संपवा, हीच भाजपची भूमिका
नेतृत्वाला संपवून टाका, हाच भाजपचा पॅटर्न आहे. हाच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला. तोच आता दिल्लीत देखील लागू करण्यात आला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. प्रमुख नेतृत्वालाच संपवा, त्यासाठी कोणतीही किंमत चुकण्याची भाजपची तयारी आहे. भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे कोणालाच वाटत नाही. मात्र हे जबरदस्तीने करून घेतलेले मतदान असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.