
तालुक्यातील पोरज येथील ११ शेतकऱ्यांना बायर कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या मका बियाण्यांमुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. या शेतकऱ्यांना कंपनीकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल २२ मार्च रोजी मेहकर येथे जाऊन शेतकऱ्यांनी नामदार प्रतापराव जाधव यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. पोरज येथील शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींकडून मका बियाण्यांची खरेदी करून पेरणी केली होती. खरेदी वेळी एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अत्यल्प उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे संबंधित प्रति निधीकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी २ फेब्रुवारी २०२६ पासून खामगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र बघे, अॅड. अमोल अंधारे, राजेंद्र अमलकार यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतली. तसेच याबाबत ना. प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधला. यानंतर प्रतापराव जाधव यांनी कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना केल्या. ४ फेब्रुवारी रोजी कंपनीचे प्रतिनिधी परम सिंग व तालुका कृषी अधिकारी पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. या वेळी कंपनीकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानुसार ५ मार्च २०२६ रोजी संबंधित ११ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली. या प्रसंगी संदीप हेरोडे, देवेंद्र इंगळे, विजय बोराडे, प्रदीप हेरोडे, निलेश वाकोडे, कडूबा शेगोकार, श्याम सकळकडे, अभय बोराडे, चत्तरसिंग बोराडे, शरद बोराडे, संजय काळे यांच्यासह पोरज येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



