
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने उल्लेखनीय यश मिळवत बहुमताचा टप्पा सहज पार केला आहे. महागठबंधन अनेक अपेक्षा बाळगत निवडणुकीत उतरले असले तरी निकालांनी त्यांचे गणित पूर्णपणे बदलून टाकले. एनडीएच्या या विजयात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारभाराबरोबरच
.
विनोद तावडे यांनी स्पष्ट केले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढलो. आता पुढे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे एनडीएतील सर्व पक्ष मिळूनच ठरवतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी दोन ते चार दिवसांत मुख्यमंत्रीपदासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे तावडे यांनी सांगितले. यामुळे एनडीएतील अंतर्गत चर्चांना वेग आला असून नव्या सरकारची रूपरेखा कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहारमध्ये भाजपने या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत महागठबंधनला जोरदार टक्कर दिली. प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगलराजाचा मुद्दा उचलून विरोधकांना चांगलेच घेरले. यामुळे मतदारांना पुन्हा एकदा मागील काळातील अस्थिरता, कायदा-सुव्यवस्था आणि विकासाच्या अडचणींची आठवण झाली. मोदी-नितीश यांच्या जोडीला मिळालेला प्रतिसाद हा एनडीएच्या विजयाचा मोठा आधार मानला जातो. कालांतराने मतदारांचा कलही स्पष्टपणे एनडीएकडे झुकताना दिसला. या निकालामुळे एनडीएच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात मतदारांनी पुढाकार घेतला आहे.
तावडे यांची सूक्ष्म रणनीती महत्त्वाची ठरली
एनडीएच्या विजयानंतर भाजपातील काही प्रमुख रणनीतीकारांचे नाव विशेष चर्चेत आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांचे नाव सर्वाधिक पुढे आहे. बिहारमध्ये उमेदवार निवड, प्रचाराची आखणी, बूथस्तरापर्यंत संघटनाचे नियोजन आणि महत्त्वाच्या सीटांवर विशेष लक्ष ठेवणे यामध्ये तावडे यांनी विशेष मेहनत घेतल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे की, बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या मागे तावडे यांची सूक्ष्म रणनीती महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे मैथिली ठाकूर यांना उमेदवार करणार्या निर्णयामागेही त्यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते.
भाजप तावडेंना मोठी जबाबदारी देऊ शकते
या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंना आता मोठे पक्षपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीनंतर भाजप तावडेंना राज्यात मोठी जबाबदारी देऊ शकते, असे कयास लावले जात आहेत. काही सूत्रांचे मत आहे की त्यांना भाजपच्या बिहार राज्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. निवडणुकीतील त्यांच्या नियोजनाची पक्षाने दखल घेत पक्ष संघटनात त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. एनडीएच्या विजयामुळे बिहारची राजकीय दिशा पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट होईल. नितीश कुमार कायम मुख्यमंत्रिपदावर राहणार की नव्या नेतृत्वाची निवड होणार? हे आगामी बैठकीनंतर स्पष्ट होणार असून बिहारची राजकीय समीकरणे आता निर्णायक टप्प्यात येत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



