
Nirmala Navale: शिरूर तालुक्यातील कारेगाव गटातील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या रूपात ओळखल्या जाणाऱ्या निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जनता पक्षाच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांना हरवले. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असूनही प्रत्यक्ष मतदानात लोकांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना हा धक्का बसला. राज्यभरातील युवक-युवतींमध्ये त्यां प्रसिद्ध असल्याने राष्ट्रवादी पक्षाने त्यांना युवती विभागाच्या प्रमुखपदी नेमले होते. त्यांनी विविध ठिकाणी दौरा करून पक्षाच्या कामाला बळ दिले होते. कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून त्यांचा अनुभवही चांगला होता, तरीही निवडणुकीत यश मिळाले नाही. जितकी लोकांच्या विजयाची चर्चा नाही तितकी निर्मला यांच्या पराभवाची चर्चा होतेय, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतायत. दरम्यान निर्मला नवले यांनी पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कोण आहे निर्मला नवले?
निर्मला नवले या इंजिनीअरिंग पदवीधर आहेत आणि समाजसेवेची त्यांना खूप आवड आहे. त्यांच्या सासरच्या नवले कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कारेगाव सारख्या मोठ्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या प्रमुखपदी त्या होत्या, जिथे त्यांनी विकासकामे हाताळली. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओ आणि रील्सना हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळतात, ज्यामुळे त्या युवा वर्गात खूप लोकप्रिय आहेत. पक्षाने त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यांना युवती कार्याध्यक्ष बनवले आणि राज्यात युवतींचे संघटन मजबूत करण्याचे काम सोपवले.
पराभवानंतर काय म्हणाल्या?
पराभवानंतर निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहिला. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करुन त्यांच्या यशासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या सहकाऱ्यांचे आभार मानले. “तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आणि साथीमुळे मी कधीच हार मानणार नाही,” असे त्या म्हणाल्या. मागील दोन महिन्यांत घेतलेल्या कष्टांची त्या ऋणी असल्याचे सांगितले. या संदेशातून त्यांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त केले, पण त्याचवेळी नव्या उत्साहाने पुढे जाण्याची जिद्दही दाखवली. 329 पराभव हा अनपेक्षित आणि वेदनादायी आहे. तो मी मान्य करते. पण तुमचा विश्वास आणि निष्ठा माझ्यासाठी खूप असल्याचे त्या म्हणाल्या.
नवले यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावपूर्ण गाणे शेअर केले, ज्यात “सत्तेचे काय कधी येते कधी जाते…” असे बोल आहेत. हे गाणे त्यांच्या परिस्थितीशी जुळते, ज्यामुळे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली. हा पराभव अंतिम नाही, असा विश्वास व्यक्त करत त्या म्हणाल्या की, ही लढाई सुरूच राहील आणि सहकाऱ्यांसोबतचा प्रवास कधीच थांबणार नाही. या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही प्रेरणा निर्माण झाली.
या निवडणुकीच्या निकालाने शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण चर्चेत आले. निर्मला नवले यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याचा पराभव हा धक्कादायक असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. पण त्यांनी दाखवलेली सकारात्मकता आणि जिद्द यामुळे त्या भविष्यात अधिक मजबूत होऊ शकतात,असेही ते सांगतात. दरम्यान सोशल मीडियाची प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष राजकारण यातील फरक या निवडणुकीच्या माध्यमातून प्रकर्षाने दिसून आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



