
Sudhakar Badgujar: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत सुधाकर बडगुजर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच तोंड फुटलं होतं. पक्षसंघटनेत बदल करताना विचारात घेतली नसल्याची नाराजी सुधाकर बडगुजर यांनी बोलून दाखवली होती. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून बडगुजर यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आलीय.
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद सुरु होती. जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेला महानगरप्रमुख विलास शिंदे उपस्थित होते. तर उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराजी असल्याचा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला होता. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेला विलास शिंदे उपस्थित होते.नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर असल्याने पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती बडगुजर यांनी दिली होती.
सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांना कॉन्फरन्स सुरू असताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा फोन आला. यानंतर त्यांनी शेजारून माईक खेचून घेतला आणि सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे आदेश फोनवर मिळाल्याची माहिती पत्रकारांना दिली. यानंतर त्यांनी तात्काळ बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली.
ठाकरेंच्या पक्षात सर्व अलबेल आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. विलास शिंदे यांनी यावेळी आपली बाजू मांडली आणि नाराज नसल्याचे सांगितले. दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा फोन आला. यानंतर पत्रकार परिषदेचा नूर पालटला.
सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पालिकेच्या कामासंदर्भात भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं तसंच आदित्य, उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांची भेट घेतल्याचं यावेळी बडगुजर म्हणाले होते. बडगुजर यांनी फडणीसांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ठाकरेंची शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान महाजनांच्या या वक्तव्यानंतर राऊतांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपणार नसल्याचा घणाघात राऊतांनी महाजनांवर केला.
ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होणार असा दावा गिरीश महाजनांनी केला असून, शिवसेना जमिनदोस्तची भाषा, महाजनांना लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली. अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
ठाकरेंच्या शिवसेनेतला कोकणातला मोठा चेहरा राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत गेले, कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठं नाव संजय घाटगे हे भाजपात, छत्रपती संभाजीनगरमधून राजू शिंदे, आणि नाशिक जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. दरम्यान यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा हात सोडला आणि शिंदेंच्या पक्षात गेलेत. तेव्हापासून आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गळती सुरूच आहे. आणि आता पुन्हा एकदा महायुती ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.