
वसमत तालुक्यातील पळसगाव येथे कर्जाला कंटाळून तसेच नापिकीमुळे शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १५ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी बाबुराव मिरकुटे (६०) यांना ३० गंुठे शेत आहे. या शेतातील उत्पन्नावर तसेच इतर मजूरीवर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. या शेतावर त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. खरीप हंगाम हाती आल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
दरम्यान, यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र पिक हाती आल्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिक वाहून गेले. हाती आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेल्यामुळे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. खरीपाचे पिक हातचे गेले आता उदरनिर्वाह कसा करावा तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता लागल्याचे ते बोलून दाखवत होते.
दरम्यान, बुधवारी ता. १२ शेतात जाऊन येतो असे सांगून ते घरून निघाले होते. शेतात गेल्यानंतर त्यांनी झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर त्यांचा नातू शेतात गेल्यानंतर त्याचे आजोबा बाबुराव यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतल्ेल्या स्थितीत आढळून आला. त्याने आरडा अोरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी व गावकरी घटनास्थळी दाखल झाले. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक एकनाथ डक, पी. व्ही. शेळके, जमादार भगवान आडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी विठ्ठल मिरकुटे यांच्या माहितीवरून आज वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक एकनाथ डक पुढील तपास करीत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



