
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या जागतिक ओळखीबद्दल केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. “अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही,” असे विधान आयुक्तांनी एका पत्रकार परिषदेत केले. आशियातील प्रगत औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची जागतिक प्रतिमा नाकारल्याने नागरिक, राजकीय नेते आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गंधर्व मंच’ संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त २ एप्रिल ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी गंधर्व महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी महापालिकेच्या (पिंपरी-चिंचवड शहर) जागतिक अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. नेमके काय म्हणाले आयुक्त? पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी गंधर्व महाविद्यालयाच्या जागतिक व्यापाचे कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराची तुलना अत्यंत नकारात्मक पद्धतीने केली. “अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाला संपूर्ण जगात ओळखले जाते, पण पीसीएमसीला जगात कोणीच ओळखत नाही,” असे विधान त्यांनी केले. एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने शहराच्या जागतिक ओळखीबद्दल असे विधान केल्याने उपस्थित सर्वच जण अवाक झाले. पत्रकारांचा जागीच आक्षेप आयुक्तांच्या या विधानावर उपस्थित पत्रकारांनी तातडीने आक्षेप नोंदवला. पिंपरी-चिंचवड हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर आशियातील एक प्रमुख ऑटोमोबाईल आणि आयटी हब (IT Hub) म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. अशा प्रगत शहराच्या प्रतिमेला धक्का लावणारे वक्तव्य जबाबदार पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने करणे चुकीचे असल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले. या वादामुळे पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश बाजूला राहून आयुक्तांच्या विधानाचीच चर्चा अधिक रंगली. शहराच्या अस्मितेचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहराने उद्योग, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. ‘फोक्सवगन’, ‘टाटा मोटर्स’, ‘मर्सिडीज बेंझ’ यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे हे शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे ओळखले जाते. असे असताना आयुक्तांनी “शहराला कोणी ओळखत नाही” असे म्हणणे, हा शहराच्या अस्मितेचा अपमान असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिका आयुक्तांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून आंदोलने किंवा राजकीय टीकास्र सोडले जाण्याची दाट शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



