
Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा निश्चय केला असून ते आज हजारो समर्थकांसहीत मुंबईत पोहोचणार आहेत. असं असतानाच आता या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर आता भाजपाने उद्धव ठाकरेंमुळेच मराठ्यांना फडणवीसांनी दिलेलं आरक्षण गेल्याचा उल्लेख केला आहे. भाजपाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
‘उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे…’
भाजपाचे माध्यम प्रतिनिधी नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेतून पक्षाची भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा, ‘औरंगजेब फॅन क्लब’ असा करत बन यांनी निशाणा साधला. “‘औरंगजेब फॅन क्लब’च्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकार वर टीका केली. त्यांनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचा नालायकपणा केला होता,” अशी आठवण बन यांनी करुन दिली. “देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. 54 मोर्चे फडणवीसांनी हाताळले. आरक्षण देण्याचं काम फडणवीसांनी केलं,” असंही बन म्हणाले.
‘आरक्षणावर बोलण्याची राऊतांची लायकी नाही’
“आरक्षणावर बोलण्याचा अधिकार राऊत यांना नाही. ‘सामना’मध्ये ‘मुका मोर्चा’ म्हणणारे व्यंगचित्र राऊत यांनीच काढले होते. महायुतीने दिलेले आरक्षण मविआ सरकारमुळे गेलं. आरक्षणाचं पाप उद्धव ठाकरेंचं आहे. राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागावी, आरक्षणावर बोलण्याची त्यांची लायकी नाही, पात्रता नाही,” अशा घणाघात बन यांनी केला. “16 टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठा आर्थिक विकास महामंडळ स्थापन फडणवीसांनी केलं,” अशी आठवण बन यांनी करुन दिली.
राऊतांनी काय टीका केलेली?
“राजकारण आम्ही करत नाही. राजकारण जे आहे जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या 10 वर्षात जास्त झालं. तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे काम करतात. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईत महाराष्ट्रात उभारली. मराठा, ब्राह्मण, घाटी, कोकणी, 92 कुळी, 96 कुळी जो एक मंत्र दिला त्या मंत्राच्या टेकड्या उडव्याचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्याने झालं. मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं. त्यांनी केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण केलं.” असा घणाघाती आरोप राऊतांनी केला.
FAQ
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाचे उद्दिष्ट काय आहे?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज 27 ऑगस्ट 2025 पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा काढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि ‘सगे-सोयरे’ धोरणाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्या आहेत. हा मोर्चा 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल, जिथे जरांगे बेमुदत उपोषण करणार आहेत.
संजय राऊत यांनी मराठा मोर्चाबाबत काय टीका केली?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली. त्यांनी म्हटले की, गेल्या 10 वर्षांत फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाती-जातींमध्ये भेद निर्माण करून मराठी माणसाची एकजूट तोडण्याचे राजकारण केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठा, ब्राह्मण, घाटी, कोकणी आणि 92-96 कुळी मराठी माणसांना एकत्र आणणारा मंत्र दिला होता, परंतु फडणवीस यांनी सत्ता मिळवण्यासाठी जातींमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
भाजपाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काय आरोप केले?
भाजपाचे माध्यम प्रतिनिधी नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘औरंगजेब फॅन क्लब’ संबोधून मराठा आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याचा आरोप केला. बन यांनी म्हटले की, फडणवीसांनी 16% आरक्षण दिले होते, परंतु महाविकास आघाडी सरकारने ते टिकवले नाही. तसेच, राऊत यांनी ‘सामना’मधील ‘मुका मोर्चा’ व्यंगचित्राद्वारे मराठा मोर्च्याची थट्टा केल्याचा आरोप करत राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली.
मराठा आरक्षणाचा इतिहास काय आहे?
2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 16% आरक्षण दिले होते. 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण 12% (शिक्षण) आणि 13% (नोकरी) पर्यंत कमी केले. मात्र, 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाल्याने हा कायदा रद्द केला. सध्या जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू आहे.
भाजपाने मराठा आरक्षणासाठी काय केले, असे त्यांचे म्हणणे आहे?
भाजपाचे नवनाथ बन यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16% आरक्षण दिले आणि मराठा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. तसेच, 54 मराठा मोर्चे फडणवीसांनी हाताळले आणि महायुती सरकारने 10% आरक्षण दिले, जे सध्या उच्च न्यायालयात टिकून आहे. त्यांनी ठाकरे यांच्या सरकारवर आरक्षण टिकवण्यात अपयश आल्याचा आरोप केला.
संजय राऊत यांनी मराठा मोर्चाचे समर्थन का केले?
राऊत यांनी म्हटले की, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाला त्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी उपरोधिकपणे सांगितले की, जर कबुतरांसाठी आंदोलनाला परवानगी मिळू शकते, तर मराठा समाजाला का नाही? त्यांनी फडणवीस यांना आंदोलकांशी संवाद साधून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.