
Devendra Fadnavis on being Narenra Modi Heir: संघ नरेंद्र मोदींचा वारसदार ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही”.
नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार? संजय राऊतांचं मोठं विधान, ‘सरसंघचालक भागवतांनी त्यांना 75 वर्षं पूर्ण झाल्यानंतर…’
पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात. सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही”.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“नरेंद्र मोदी-मोहन भागवत यांच्या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत. नरेंद्र मोदी यांनी 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असं धोरण जाहीर केलं होतं. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करुन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर महिना येत असून, देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. दुसरीकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही संघाची एक भूमिका असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपाच्या अध्यक्षपदी यावी अशी संघाची भूमिका स्पष्ट दिसत आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘…तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे’, संजय राऊतांचं मोठं विधान
“मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात. संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल,” असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणावर मांडली भूमिका
दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या मुद्यांवरही भाष्य केलं. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांन सांगितलं. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.
राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, “ही जी कबर आहे तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.