
Bachchu Kadu : बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मानधन द्यावे यासह 17 मागण्यासाठी आंदोलन करत संपूर्ण राज्यात सरकार विरोधात रान उठवलं. मात्र हे आंदोलन संपताच कडू यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आणि भविष्यात सत्वपरीक्षा द्यावी लागणार असल्याचही सूचक वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. त्यानंतर काहीच वेळात बच्चू कडू यांच्यावर विभागीय सहनिबंधकांनी कारवाई करत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर अपात्रतेची कारवाई केली. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत सध्या वाढ झाली असल्याचे बोलल जात आहे. काय आहे या मागचं राजकारण पाहूया सविस्तर
बच्चू कडू गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढाई लढत आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी बच्चू कडू यांनी आतापर्यंत अभिनव आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी मांडत राहिले. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कडू यांचा पराभव झाला. त्यानंतर कडू यांच्या आंदोलनाची धार बोथर होईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र गप्प बसतील ते बच्चू कडू नाही म्हणत बच्चू कडू यांनी पुन्हा शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीच्या शेजारी तब्बल सात दिवस अन्नत्याग आंदोलन करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि 17 पैकी काही मागण्या मान्य करत बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन काही काळासाठी स्थगित केलं.
मात्र, बच्चू कडूंनी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला असून आता 2 ऑक्टोबर पर्यंत सरकार कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करणार असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडूंनी सरकारवर केला. त्यानंतर काहीच वेळात बच्चू कडू यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावर विभागीय सहनिबंधकांनी अपात्रतेची कारवाई केली. आता या विरोधात बच्चू कडू हे मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने हे प्रकरण स्वीकारलं असून आज या प्रकरणावर सुनावणी न घेता येत्या 24 तारखेला पुढील सुनवाणी होणार असल्याने बच्चू कडूंची धाकधूक वाढली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावरून अचानक अपात्र केल्याने बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. यावर आज दुपारी सुनावणी झाली असून आता पुढील सुनावणी येत्या 24 तारखेला होणार आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो आदेश दिला आहे तो दबाव तंत्र वापरून दिलेला आहे. जिल्ह्यातील काही काँग्रेसचे लोक हे बीजेपीचे स्लीपर सेल म्हणून समोर येत आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नोटीस पाठवली असं बोलल्या जात आहे.
‘कायदा पायदळी तुडवायचा प्रयत्न’
मात्र, ती नोटीस अजूनही मला मिळाली नाही 13 मे ची नोटीस ही आज आम्हाला माहित पडते यात मोठी गडबड आहे. हे मोठं दबाव तंत्र असून सूळ घेण्याचा प्रयत्न आहे. सामान्य माणसाचा आवाज उठवू नये कायदा पायदळी तुडवायचा हा प्रयत्न असल्याचाही कडू म्हणाले. प्रभू रामचंद्राच्या या भाजप सरकारला सद्बुद्धी देवो. नाय देवता आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्यावर देखील कुठले दबाव येणार नाही हे मला माहित आहे असेही कडू म्हणाले.
बच्चू कडू आमदार असताना सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले होते. मात्र, सरकारमध्ये राहून सरकारवर कडू यांनी वारंवार टीका केल्याने बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत भाजपने पराभव केला आणि आता कडू भाजप विरोधात आंदोलन करत असल्याने भाजप कडू यांच्यावर सुडाची कारवाई करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय राजकारण घडते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.