
बायकोने गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडल्यानंतर घाबरलेल्या नवऱ्याने पुलावरून समुद्रात उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची विचित्र घटना ठाणे जिल्ह्यातील ऐरोली खाडी परिसरात घडली आहे. पण सुदैवाने हा व्यक्ती गाळात अडकल्यामुळे बचावला.
.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा ठाण्यातील रहिवासी आहे. तो ऑटोरिक्षा चालवतो. तो विवाहित आहे. पण त्याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही गोष्ट त्याच्या पत्नीला समजली होती. पत्नीने बुधवारी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यात तो आपल्या प्रेयसीसोबत एका लॉजवर गेल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर ती थेट त्या लॉजवर जाऊन धडकली. तिने आपल्या पत्नीला रंगेहात पकडले. त्याचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे घाबरलेल्या पतीने तेथून पळ काढला.
समुद्रात गाळात फसल्याने वाचला
या घटनेमुळे अपमानित झालेल्या नवऱ्याने बुधवारी रात्री ऐरोली खाडीवरील पुलाच्या दिशेने धाव घेतली. त्याने लोकलाजेखातर थेट पुलावरून समुद्रात उडी मारली. तत्पूर्वी, बायकोला फोन करून आपली चूक झाल्याचे मान्य केले. तसेच आपण आता आत्महत्या करत असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर लागलीच त्याने पुलावरून उडी मारली. त्यानंतर पत्नीने ही गोष्ट पोलिसांना सांगितली. पत्नी व तिच्या नातेवाईकांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. रबाळे पोलिस, ऐरोली अग्निशमन दल व नातेवाईकांनी जवळपास 2 तास शोधमोहीम राबवली. पण तो सापडला नाही. अखेर सदर व्यक्ती समुद्रात वाहून गेल्याचे समजून तेथून काढता पाय घेतला.
गुरूवारी सकाळी पुन्हा त्याचा शोध घेतला. तेव्हा खाडी पुलापासून काही अंतरावर एक व्यक्ती समुद्राच्या गाळात अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी बोटीच्या मदतीने तिकडे धाव घेतली. सदर व्यक्ती जिवंत होता. पोलिसांनी त्याला गाळातून बाहेर काढले. रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर चौकशीत हा व्यक्ती बुधवारी मध्यरात्री पुलावरून उडी मारणारा ऑटोचालक असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणात सदर व्यक्तीचा नाट्यमय पद्धतीने प्राण वाचले असले तरी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजला आहे.
बीड जिल्ह्यात मेंढपाळाचा डोक्यात दगड घालून खून
दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील खुनांची मालिका अजूनही सुरू आहे. पाटोदा तालुक्यातील रायमोहा पोलिस चौकी हद्दीतील दगडवाडी येथे शुक्रवारी पहाटे एका मेंढपाळ तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दीपक केरा भिल्ल (19) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरचा आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत तो मेंढ्या चारण्यासाठी या परिसरात आला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, विलास एकनाथ भोसले (52) यांनी दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला. आरोपी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरचा रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या खुनांच्या घटनांच्या मालिकेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संभाजी तागड प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.