
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत १२ जणांचे अर्ज आले आहेत. त्यात ‘बिग बॉस’ फेम आणि नेहमीच चर्चेत राहणारे अभिजित बिचुकले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. बारामती पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रमही जाहीर झाला असून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 9 एप्रिल आहे. तर या निवडणुकीसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात अभिजित बिजकुले यांनी देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेमके काय म्हणाले अभिजीत बिचुकले? कोणतीही निवडणूक असो, उमेदवारी अर्ज भरण्यात अभिजीत बिचुकले नेहमीच आघाडीवर असतात. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होणारी पोटनिवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “मी अपक्ष अर्ज का भरला आणि माझी पुढील रणनीती काय असेल, हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करेन,” असे बिचुकले यांनी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची मांदियाळी बारामतीच्या रिंगणात आतापर्यंत १२ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अभिजीत कांबळे, दादा एकनाथ थोरात, संकेत गावडे, अनिल तपे, रझ्जाक उर्फ अब्दुलरौफ जफर मुलाणी, विलास होळकर, संदीप जनार्दन खरात, मिथुन सोपानराव आटोळे, अरुण नितुरे, दत्तात्राय रावसाहेब बेडरे, दिलीप प्रभाकर अलोनी, त्रिशला कांबळे, गजानान उत्तम गवळी, रघू येताळा घुटूकडे, सागर शरद भिसे आणि सतिश कदम यांचा समावेश आहे. विरोधकांचा आक्रमक पवित्रा दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “आम्ही आमचा उमेदवार उभा करणारच. मी स्वतः उभा राहणार की अन्य कोणी, हे लवकरच स्पष्ट करू,” असे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीकाही केली. “निवडणुकीत आश्वासने दिली जातात, पण ती पाळली जात नाहीत,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यावर ठाम आहे. राजकीय समीकरणे आणि मोठे प्रश्न या पोटनिवडणुकीत केवळ एक जागा भरली जाणार नाही, तर सहानुभूतीची लाट निर्णायक ठरणार का? विरोधक एकत्र येऊन लढत देणार का? की शेवटच्या क्षणी बिनविरोधाचा मार्ग मोकळा होणार? असे अनेक मोठे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. बारामती केवळ एक मतदारसंघ नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘पॉवर सेंटर’ मानली जाते. त्यामुळे येथील प्रत्येक हालचाल राज्यभर परिणाम घडवू शकते. सध्या तरी 30 अर्जांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. पुढील काही दिवसांत माघारी, उमेदवारी आणि राजकीय चर्चांच्या फेऱ्यांमुळे चित्र अधिक स्पष्ट होईल. बिनविरोध असो किंवा थेट लढत— बारामतीचा निकाल आता संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




