
महाराष्ट्राच्या राजकारणात राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना या दोघांच्या मामांनी भविष्यात हे दोन्ही भाऊ राजकीय पटलावर निश्चितच एकत्र दिसतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. सध्या मराठी माणसांवर मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे राज व
.
राज व उद्धव ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीविरोधात 5 जुलै रोजी एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या मोर्चाद्वारे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे दोन्ही भाऊ भविष्यात निश्चितच एकत्र येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. चंद्रकांत वैद्य म्हणाले, आजच्या घडीला मराठी माणसांसाठी व मराठीच्या मुद्यावर हे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत हीच चांगली घटना आहे. त्यांची सकारात्मक पाऊले पडत आहेत.
त्यांना सल्ला द्यायला ते लहान नाहीत
देवाची कृपेने व महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून हे खूप चांगले आहे. मी मामा म्हणून हे दोघेही एकत्र येण्याचे स्वप्न पाहत असतो. ते आता लवकरच पूर्ण होईल याची मला खात्री आहे. मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही भाऊ एकेक पाऊल पुढे आलेत. आता भविष्यात ते एकेक हात पुढे येऊन ते एकत्र येतील असे मला वाटते. त्यांना सल्ला देण्यासाठी आता ते लहान नाहीत. त्यांना सगळ्या गोष्टींची जाण आहे. त्यामुळे पुढची सर्वच पाऊले यशस्वी व सकारात्मक असतील असा विश्वास आहे. वेळ व तारीख यासाठी शुभसंकेत मिळालेत. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येतील असे वाटते.
आजच्या घडीला त्यांचे एकत्र येणे महत्त्वाचे
ते पुढे म्हणाले, राज व उद्धव एकत्र येण्यामुळे राजकारणात काय चित्र बदलेल हे मला सांगता येत नाही. पण मराठी माणसांना व महाराष्ट्रासाठी सगळ्यांना बळ मिळेल. मराठी माणसांची सध्या जी हेटाळणी होत आहे, त्याला आळा बसेल. विशेषतः मराठी माणसांवर अन्याय होत असताना त्यांच्या मनात आपल्यामागे कुणीतरी उभे राहील याची खात्री मिळेल. मराठी माणसांना बळ मिळेल. त्यातून त्यांचे भले होईल. मराठी माणूस म्हणून मी नक्कीच 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होईल. माझे दोन्ही भाचे एकत्र पाहून मामा म्हणून मला मोठा आनंद होईल. पुढे काय होईल हे जनता ठरवेल. पण आजच्या घडीला त्यांचे एकत्र येणे खूप महत्त्वाचे होते, असे चंद्रकांत वैद्य म्हणाले.
हिंदीच्या सक्तीविरोधात 5 जुलैला मोर्चा
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मराठी भाषिकांत मोठा असंतोष पसरला आहे. या प्रकरणी राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्यावर एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. तूर्त हे दोन्ही भाऊ 5 जुलै रोजी निघणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होणार आहे. त्यामुळे मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आगामी वाटचालीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.