
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे सत्र सुरू असून, अनेक नेते व पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या तिकिटाच्या राजकारणात आपले गणित जुळवू पाहत आहेत. नेहमीप्रमाणे
.
अलीकडेच अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव नंतर शिवसेनेत सामील झाले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत थेट भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये अप्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे.
आमदार बालाजी किणीकर यांची तीव्र प्रतिक्रिया
या घटनाक्रमानंतर अंबरनाथचे आमदार आणि शिवसेन नेते बालाजी किणीकर यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपने सुरेंद्र यादव यांना पक्षात घेऊन युतीधर्माचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी ठरले होते की युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षात घेतले जाणार नाही. मात्र, भाजपने हा करार मोडला आहे, असा थेट आरोप किणीकरांनी केला. त्यांनी पुढे स्पष्ट इशारा देत म्हटले, जर भाजप युतीधर्माचे पालन करणार नसेल, तर आमच्याकडेही भाजपच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी आहे. त्यांनाही आम्ही आमच्या पक्षात घेऊ शकतो.
भाजप मौनात, युतीत तणाव वाढण्याची शक्यता
किणीकर यांच्या या वक्तव्यामुळे अंबरनाथमधील महायुतीतील एकजूट धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. भाजपकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर सत्ता वाटप, नगरसेवक उमेदवारी आणि संघटनात्मक भूमिका यांवर या घटनेचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युतीतील समन्वयासाठी वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंबरनाथमधील समीकरणांवर परिणाम
अंबरनाथ पालिका निवडणुका लक्षात घेता भाजप आणि शिंदे गटाने आतापर्यंत एकत्रितपणे मोर्चेबांधणी केली होती. मात्र, यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, पक्षांतरांच्या या मालिकेमुळे युतीतील विश्वासाचे समीकरण ढासळू लागल्याचे जाणकारांचे मत आहे. आगामी काही दिवसांत या वादावर तोडगा न निघाल्यास, अंबरनाथ हे महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.