
Thorium-based Power Plant: थोरियमवर आधारित वीज निर्मिती केंद्र उभारले जाणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे. राज्य सरकार, केंद्राच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीआयएल) यांच्यात याबाबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. हे केंद्र महाराष्ट्राच्या ‘महाजेनको’ कंपनीच्या मालकीच्या जागेवर बांधले जाणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जुने थर्मल पॉवर प्लांट नव्याने उभारणार
या योजनेत दोन मुख्य भाग आहेत. पहिले केंद्र 1540 मेगावॅट क्षमतेचे तर दुसरे 440 मेगावॅटचे असणार आहे. हे जुने थर्मल पॉवर प्लांट जागेवर नव्याने उभारले जाणार आहेत. थोरियम हे भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, विशेषतः केरळ, तमिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरील रेतीत ते मोठ्या प्रमाणावर आढळते. हे केंद्र सामान्य दाबावर चालते, ज्यामुळे ते अधिक विश्वासार्ह आहे. या बांधकामामुळे राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढून कार्बन उत्सर्जन कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
थोरियमच्या वापराचे मुख्य फायदे
थोरियम हे स्वदेशी इंधन असल्याने आपल्याला परदेशी युरेनियमवर अवलंबून राहण्याची गरज नाही. भारतात थोरियमचे जगातील सर्वाधिक साठे आहेत. ज्याचा फायदा घेऊन देश स्वयंपूर्ण होईल. हे इंधन कमी किरणोत्सर्गी कचरा निर्माण करते. ज्यामुळे पर्यावरणाला कमी नुकसान होते. सामान्य वीज केंद्रांपेक्षा हे अधिक स्वच्छ आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. यामुळे केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ ध्येयाला हातभार लागणार आहे..
पर्यावरणीय लाभ
थोरियम आधारित केंद्रात गळती किंवा मोठ्या अपघाताचा धोका कमी आहे, कारण ते वातावरणीय दाबावर काम करते. युरेनियम केंद्रांप्रमाणे उच्च दाबाची गरज नाही. हे केंद्र कमी कचरा तयार करते, ज्यामुळे प्रदूषण कमी होते. राज्याला स्वच्छ ऊर्जा मिळेल, ज्यामुळे हवामान बदलाशी लढण्यात मदत होईल. हे केंद्र सुरक्षित असल्याने स्थानिक लोकांना चिंता करण्याची गरज नसेल, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.
तुम्हाला कसा फायदा?
या केंद्राची चालू करण्याची किंमत पारंपरिक कोळसा केंद्रांपेक्षा कमी आहे. वीज उत्पादनाचा दर सुमारे 3.50 रुपये प्रति युनिट असेल, जो सध्याच्या दरांपेक्षा खूप कमी आहे. सध्या उद्योगांसाठी 8.32 रुपये आणि घरगुती वापरासाठी 4.43 ते 14.33 रुपये प्रति युनिट आहे. यामुळे राज्यातील उद्योग आणि सामान्य नागरिकांना स्वस्त वीज मिळेल, ज्यामुळे विकास वेगवान होईल.
अणुऊर्जा कार्यक्रमाचा भाग
ही योजना भारताच्या तीन टप्प्यांच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा भाग असून ज्यात थोरियमचा वापर आत्मनिर्भरतेसाठी महत्वाचा आहे. हे केंद्र देशाला स्वस्त, सुरक्षित आणि स्वदेशी वीज पुरवणार आहे. जगातील ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांनंतर भारत थोरियमचा सर्वाधिक फायदा घेईल. यामुळे ऊर्जा परिवर्तन होईल आणि महाराष्ट्र देशातील आदर्श राज्य बनणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



