
IND VS PAK : रविवार 14 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025 स्पर्धेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला उबाठाने विरोध केलेला आहे. त्यावर खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना UBT ला खडेबोल सुनावले. ‘तणावाच्या वेळी काँग्रेस सत्तेत असताना दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळले गेले आहेत. मात्र रोज पाकिस्तानचे गोडवे गात काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला या सामन्याला विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही. `शेंदूर’ उडालेल्या दगडांनी `सिन्दुर’ची काळजी करू नये’, अशा तीव्र शब्दांत शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना UBT च्या रविवारच्या आंदोलनावर पत्रकार परिषद घेत टिका केली.
खासदार नरेश म्हस्के यांनी सरकारची बाजू घेत म्हटले की, ‘पाकिस्तानबाबतच्या देशाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोवर दोन देशात सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊच शकत नाहीत, ही एनडीएची भूमिका होती आणि आजही तीच भूमिका आहे. अशिया कपमध्ये एक क्रिकेट सामना खेळल्याने त्यात बदल झाला असे म्हणणे चुकीचे आहे. दोन देशात क्रिकेट नाही तर कोणतेच सामने होत नाहीत. पाकिस्तानी खेळाडूंना अजूनही आयपीएलचे दरवाजे बंद आहेत. मात्र जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात तेव्हा पूर्वीही असे सामने झाले आहेत. वर्ल्ड कपमध्ये आपण खेळलो असल्याची आठवण खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना UBT च्या नेत्यांना यावेळी करुन दिली.
उद्धव ठाकरेंवर केली टीका :
आमच्याविरोधात उबाठाचे नेते रोज उर बडवत असतात. परंतु क्रिकेट सामन्याला विरोध करतांना पंतप्रधानांबाबत बोलताना आपण काय शब्द वापरतो त्याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आपली पात्रता, आपली कुवत ओळखून बोलले पाहिजे. ज्या लोकांविरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या सोबत सत्तेत बसणे याला निर्लज्जपणा म्हणतात. हिंदुत्वाचा विचार सोडून सत्तेसाठी लाचारी स्वीकारण्याला निर्लज्जपणा म्हणतात. मुंबईच्या गुन्हेगाराला, बॉम्बस्फोटातल्या आरोपींना प्रचारात घेऊन फिरण्याला निर्लज्जपणा म्हणतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी उध्वव ठाकरे यांच्यावर केली आहे.
शेंदूर उडालेल्या दगडांनी ‘सिंदूर’ची काळजी करू नये !
पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, ‘खरं तर ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत संशय व्यक्त करणाऱ्या, देशाच्या जवानांनी गाजवलेल्या शौर्यावर शंका व्यक्त करणाऱ्या लोकांना सिंदूर बाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांनी सिंदूरचा अवमान केला आहे. आता निवडणुका आल्याने त्यांना सन्मान शब्द आठवला का? निवडणूक प्रचारात आयएसआयच्या हस्तकांना आणि बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरणाऱ्यांनी सिंदूर सारखे पवित्र शब्द उच्चारूही नयेत. देशाचे संरक्षण करण्यासाठी मोदी आणि शाह यांचे नेतृत्व समर्थ आहेत. बाजारबुनग्यांनी त्याची चिंता करू नये. पहलगामचा हल्ला झाला तेव्हा उध्वव ठाकरे हे परदेशात टूर करत होते. मात्र त्यानंतर एकाही पिडित बहिणीची साधी विचारपूसही केली नाही. आता ते ‘माझं कुंकू, माझा देश..’ असे अभियान राबवणार आहेत. २०१९ साली एकाशी लग्न, दुसऱ्याशी संसार हे अभियान राबवले होते. काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ले होत असताना भारत पाकिस्तानात जाऊन क्रिकेटचे सामने खेळला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या कुवतीच्या पलिकडचा विषय आहे’, अशी टिका खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
FAQ :
शिवसेना UBT ने आशिया कप सामन्याला का विरोध केला आहे?
उत्तर: शिवसेना UBT ने पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यांचा हवाला देत हा सामना देशद्रोह असल्याचे म्हटले. त्यांनी १४ सप्टेंबर रोजी ‘सिंदूर रक्षा अभियान’ अंतर्गत आंदोलनाचा ऐलान केला, ज्यात महिलांना सिंदूर पाठवण्याची विनंती करण्यात आली.
खासदार नरेश म्हस्के यांनी सरकारची भूमिका कशी स्पष्ट केली?
उत्तर: पाकिस्तानबाबत देशाची भूमिका बदलली नाही. दहशतवाद थांबेपर्यंत सौहार्द शक्य नाही, ही NDA ची भूमिका आहे आणि आजही तीच आहे. क्रिकेट सामन्याने त्यात बदल होत नाही. वर्ल्ड कपसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पूर्वीही असे सामने झाले, पाकिस्तानी खेळाडूंना IPL बंद आहे, पण बहुपक्षीय स्पर्धा अनिवार्य आहेत.
उद्धव ठाकरेंवर खासदार नरेश म्हस्के यांनी कोणती टीका आहे?
उत्तर: UBT नेते रोज विरोधकांना उर बडवतात, पण पंतप्रधानांबाबत बोलताना शब्दांचे भान ठेवावे. सत्तेसाठी हिंदुत्व सोडणे, मुंबई बॉम्बस्फोट आरोपींना प्रचारात घेणे हे निर्लज्जपणा आहे. निवडणुकीत ISI हस्तकांना घेऊन फिरणाऱ्यांनी सिंदूरासारखा पवित्र शब्द उच्चारू नये
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.