
Secular Front in Bhiwandi Municipal Corporation: भिवंडी महापालिकेत काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भिवंडी महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक 30 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 46 जागांची गरज होती. यानंतर काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सेक्युलर फ्रंटची स्थापना केल्यानंतर हा आकडा 42 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर आता भाजपात फूट पडली असून, 9 नगरसेवक सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महापौरपदासाठी सर्वांनी स्वतंत्र अर्ज केले असून, चर्चेनंतर अर्ज मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेतले जातील असंही त्यांनी सांगितलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “भिवंडीत काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेली होती. जनतेने काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून दिले. 46 हा जादुई आकडा आहे. आम्हाला 16 जागा कमी पडल्या. त्या कमी पडल्या असताना स्वबळावर असल्याने आघाडीचं राजकारण करणं हे भारताच्या लोकशाहीला अनुसरुन आहे. आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट स्थापन केला. तिथे आमचे सर्वात आधी इंडिया आघाडीचे मित्र, मविआतील मित्रपक्ष, तुतारीवर जे बाळूमामांच्या नेतृत्वात निवडणूक लढले त्या 12 जणांना फ्रंटमध्ये समाविष्ट केलं. आम्ही सेक्युलर फ्रंट म्हणत असलो तरी हे इंडिया आघाडीचे दोन पक्ष आहेत. आमची संख्या 42 झाली. 46 पर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. यादरम्यान आम्ही वेगवेगळे प्रयत्न केले. अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. समाजवादी जनता दलाला सोबत घेण्याचाही प्रयत्न केला. पण कोंडी फुटत नव्हती”.
“अशा स्थितीत काँग्रेस पक्षाने महापौर पदासाठी अर्ज दाखल करताना स्वतंत्र अर्जही दाखल केला. इतर उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम्ही एकसंघ राहून पुढे जात असताना वेगवेगळे प्रस्ताव आले. त्या प्रस्तावात काँग्रेसने कोणतीही तडजड केली नाही. भाजपासोबत, शिंदे सेनेसोबत जाणार नाही, पाठिंबा देणारही नाही, घेणारही नाही त्यावर आम्ही ठाम होतो. वेगवेगळ्या युतीचाही प्रस्ताव आला,” अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितलं की, “भाजपातून कोणी त्यांचा विचार सोडून, सोडचिठ्ठी देऊन येत असेल चर्चेसाठी तयार आहोत अशी भूमिकाही होती. त्याला आम्हाला साथ मिळाली आहे. नारायण चौधरी आपल्या गटासह सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले आहेत. आता महापौरपदासाठी त्यांचाही अर्ज आहे. आमचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आणि नारायण चौंधरीचे 9 अशी मोट बांधली आहे. काँग्रेस पक्ष सर्वात मोठा असल्याने महापौरसंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. आम्ही तिथे निरीक्षक पाठवणार असून, त्यासंदर्भात चर्चा केली जाईल. भाजपाला सोडून आलेले चौधरी हे आता काँग्रेसप्रणीत आघाडीचे सदस्य असतील”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



