
मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेच्या मोर्च्यानंतर शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेले
.
मिरा-भाईंदरमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मिरा-भाईंदर हे सर्व जातीधर्मांचे शहर आहे. इथे अनेक हिंदीभाषिक नागरिक आहेत. त्यामुळे जर आवश्यक असेल तर आपण हिंदी भाषेत संवाद साधावा, यात गैर नाही. पुढे ते म्हणाले की, मी स्वतः मराठी आमदार असलो तरी, जनतेशी संवाद साधताना जर हिंदी बोलण्याची वेळ आली, तर मी ती बोलतो.
सरनाईक यांच्या या वक्तव्याचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील मराठी संघटनांनी तीव्र प्ेरतिक्रिया नोंदवल्या आहेत. मनसेसह शिवसेनेच्या विरोधी गटांनी सरनाईक यांच्यावर मराठी माणसाची भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
कार्यक्रमात आसामचे आयुक्त मराठीत बोलले, पण सरनाईक हिंदीत
या कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी कृष्ण पांचाळ, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, मूळ आसाममधील असलेले आयुक्त शर्मा यांनी संपूर्ण भाषण मराठीत केले. मराठी न येऊनही त्यांनी मराठी भाषेत संवाद साधला, याचे सर्वत्र कौतुक झाले. परंतु त्यानंतर मंचावर आलेले मंत्री सरनाईक हिंदीत बोलू लागले, आणि तेव्हाच अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. मराठी मंत्र्यांना मराठी प्रेक्षकांसमोर हिंदीत बोलायची गरज काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी
राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे की, शिंदे गटाने हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाणूनबुजून ही हिंदीकडे झुकलेली भूमिका घेतली आहे का? कारण मिरा-भाईंदर महापालिकेत हिंदीभाषिक मतदारांचा मोठा प्रभाव आहे.
मनसेचा मोर्चा आणि ‘मराठी भाषेचा अपमान’ प्रकरण
मिरा-भाईंदर मधील वातावरण आधीच तापलेले आहे. 29 जूनच्या रात्री मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या दुकान मालकावर केलेल्या कारवाईनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. जोधपूर स्वीट्स अँड फरसाणच्या मालक बाबूलाल चौधरी यांनी मराठी बोलण्याची काय गरज? असं म्हटले होते. त्यावर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि चक्क कानाखाली वाजवली. हा व्हिडिओ व्हायरल होताच मराठी-अमराठी प्रश्न पुन्हा एकदा पेटला. या घटनेनंतर अमराठी व्यापार्यांनी मोठा मोर्चा काढून मनसेविरोधात घोषणा दिल्या. दोन्ही बाजूंच्या गटात तीव्र वाद आणि मारहाणीच्या घटना घडल्याने पोलिसांना मोठ्या प्रमाणावर फोर्स तैनात करावा लागला होता. अशा पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्या वक्तव्याने तेल ओतल्यासारखे झाले आहे.
मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा अग्रभागी
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा कायमच भावनिक राहिला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरसारख्या परिसरात अमराठी लोकसंख्येमुळे हा प्रश्न नेहमीच संवेदनशील ठरतो. मनसे आणि शिवसेनेचा मूळ पाया मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा हा असल्याने, त्याच पक्षातील नेत्यांकडून हिंदीचे समर्थन केल्यास तो मुद्दा राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतो, अशी मते राजकीय विश्लेषक मांडत आहेत. मराठी भाषिक नागरिकांनी सोशल मीडियावर आसामचे आयुक्त मराठीत बोलतात, पण महाराष्ट्राचे मंत्री हिंदीत! असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. काहींनी सरनाईक यांच्यावर शिंदे गट मराठीचा मुद्दा विसरला अशी टीकाही केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदीची हाक दिली
राजकीय तज्ज्ञांच्या मते, मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत हिंदीभाषिक मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक समावेशकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हा प्रयत्न मराठी मतदारांना परके वाटू लागला तर उलट परिणाम होऊ शकतो. दरम्यान, मनसेने या प्रकरणावर तातडीने प्रतिक्रिया देत शिवसेना मराठी अस्मिता विसरली आहे असा आरोप केला आहे. तर सरनाईक यांच्या समर्थकांचा दावा आहे की, त्यांचा उद्देश केवळ सर्व भाषिकांमध्ये संवाद वाढवण्याचा होता, मराठीचा अपमान नव्हता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.