
मनश्री पाठक, (प्रतिनिधी) मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू आणि पवार काका-पुतण्या एकत्र येण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे काँग्रेसची मात्र कोंडी झाली आहे. सोबतच महाविकास आघाडीचं अस्तित्वही धोक्यात आलं आहे. आणि त्यामुळे मविआ वाचवण्यासाठी काँग्रेसची आता धावाधाव सुरू झाल्याचं दिसतंय.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील. त्यांची युती होईल या चर्चांना भलतचं उधाण आलं आहे. मात्र त्याचं पुढे काही झालं नाही. तिकडे शऱद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातही मनोमिलनाचे वारे वाहू लागले. त्या वा-याची दिशाही अजून ठरली नाही. मात्र या सगळ्या चर्चेत काँग्रेस बाजूला एकटी पडलीये. ज्या कारणासाठी काँग्रेसकडून सध्या मविआ नेत्यांच्या गाठीभेटी सुरु आहेत. काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधी शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
सध्या मविआतील पक्षांचा मुड काय?
विधानसभेत दारुण पराभव झाल्यावर आता महापालिका निवडणुकांसाठी कॉग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षातून एकला चलोचा सूर दिलाय. शरद पवारांसोबतचे आमदार सत्तेत म्हणजेच अजित पवारांकडे जाणार अशी चर्चा आहे. काँग्रेसला निवडणुकीत शिवसेना- ठाकरे गटाची मदत मिळत नाही अशी तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. विधानसभेच्या अनुभवानंतर आता ठाकरे- काँग्रेसनं वेगवेगळं लढावं असा मतप्रवाह दोन्ही पक्षांमध्ये आहे.
मविआतील उद्धव ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष आघाडीत सध्या फारशी सक्रीय दिसत नाहीत. अश्या स्थितीत कॉग्रेस राज्यात निवडणूकीत नाही पण विरोधक म्हणून मविआची मोट एक ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. कॉग्रेसच्या या प्रयत्नांनी आगामी महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडीची सैल होत जाणारी पकड घट्ट होईल का? हेच पाहावं लागणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.