
Ahamadnagar Nandur Nimba Daitya Village : गाव म्हटलं तर वेशीवरचा मारुती आलाच. महाराष्ट्रात गाव तिथं मारुतीचं मंदिर असतंच. मारुती, हनुमान या नावाचा एकतरी माणूस गावात असतोच. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे की ज्या गावात मारुती नावाचा माणूसच सापडत नाही. हे गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्यनांदूर..दैत्यनांदूर गाव हे महाराष्ट्रातील इतर हजारो गावांसारखंच एक गाव. पण या गावाच्या वेशीजवळ तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसणार नाही.. गावात प्रवेश केल्यावर तुम्हाला एक गोष्ट कायम खटकत राहते. या गावात मारुती नावाचा माणूसच नाही.
दैत्यनांदूर गावात मारुती आणि हनुमान नावाचा माणूसच सापडत नाही. गावची लोकसंख्या साडेतीन हजार एवढी आहे. यातले निम्मे पुरुष धरले तरी त्यापैकी एकाचंही नाव मारुती नाही. बारशाला कुणाचंही नाव मारुती ठेवलं जात नाही. या गावातील माणसं सगळ्यांची नावं घेतात पण त्यांच्या तोंडी कधी मारुती नाव आल्याचं कुणाच्याही ऐकिवात नाही. एवढंच नाही तर चुकूनही मारुती स्त्रोत किंवा हनुमान चालिसाही या गावात पठण केली जात नाही.
मारुती नावाची ऍलर्जी एवढ्यापर्यंत नाही तर कार उत्पादक कंपनी असलेल्य़ा मारुती कंपनीची एकही कार गावात नाही. गावातल्या घरांसमोर वेगवेगळ्या कंपनीच्या कार दिसतात. पण कोणत्याही घरासमोर तुम्हाला मारुती कार पार्क केलेली दिसणार नाही. गावात शंभरएक कार असतील पण त्या सगळ्या कार मारुती कंपनी वगळून मारुती कंपनीची कार भारतात कितीही लोकप्रिय असली तरी दैत्यनांदूर गावात मारुती कारवर बंदी असल्यासारखी स्थिती आहे. गावक-याला फुकट दिली तरी कोणीही मारुतीची कार घेणार नाही अशी स्थिती आहे. दुस-या गावातून कुणी मारुती कार गावात आणली तर त्या गाडीत आपोआप बिघाड होतो असा दावा गावकरी करतात.
मारुती नाव टाळणं इथपर्यंत मर्यादित नाही. तर सोयरिकवरही मारुती नावाचा फरक पडतोय. लग्नाचा मुलगा कितीही शिकलेला असू दे मोठी सरकारी नोकरी असू दे घरचा तालेवार असला तरी मारुती नावाच्या मुलाला या गावातली सोयरिक मिळत नाही. मारुती नाव म्हटल्यावर डायरेक्ट नावावर फुली पडली हे तुम्ही समजून जा. गावकरी मारुती, हनुमान नाव असलेल्या मुलाला आपली मुलगी देत नाही. फारच नड आली तर नावरशीतून मारुती वगळता दुसरं नाव मिळतं का याचा शोध घेतला जातो. पण मारुती नावाच्या तरुणाला या गावात कोणीही मुलगी देत नाही.
मारुती नावाचा नियम गावकरी एवढा काटेकोरपणे पाळतात की सांगता सोय नाही. जेवढं होईल तेवढं मारुती नाव टाळण्याचा प्रयत्न करतात. जावयाचं नाव मारुती नसावं हे गावक-यांच्या हातात आहे. पण कुणाच्या ना कुणाच्या तरी नातेवाईकांचं नाव मारुती असतंच. ही अडचणही गावक-यांनी सोडवलीये. याच्यावरही गावक-यांनी आपल्या पद्धतीनं उपाय शोधून काढलाय. गावकरी गावात मारुती किंवा हनुमान नावाचा पाहुणा आल्यावर त्याचं नावच घेत नाही. मारुती नावाचा माणूस मोठा असेल तर त्याला पावनं आणि छोटा असेल तर त्याला बाळा किंवा टोपणनावानं हाक मारली जाते.
मारुती नावाला गावकरी का घाबरतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. जिथं प्रत्येक गावाच्या वेशीवर मारुतीचं मंदिर आहे. पण दैत्यनांदूर गावात मारुती नाव का नाही? गावकरी मारुती नावाला का घाबरतात असा प्रश्न सगळ्यांनात पडला असेल. आम्हीही यामागचं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला.
या गावात चक्क दैत्याची म्हणजेच राक्षसाची पूजा केली जाते. नांदूर गावचा ग्रामदैवत निंबादैत्य आहे. राक्षसाला या गावात देव मानलं गेलंय. दैत्यनांदूरमध्ये मारुती नावावरच्या बंदीमागची कहाणी गावच्या नावातच दडलेली आहे. या गावाचं नाव दैत्यनांदूर असं पडलं ते दैत्यनांदूर नावाच्या राक्षसामुळं.
ही कहाणी तुम्हाला थेट पुराणात म्हणजे त्रेतायुगात घेऊन जाते. सीतेचं हरण केल्यानंतर हनुमान सीतेच्या शोधासाठी दंडकारण्यापासून सुरुवात करतात. सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान निंबा राक्षसाचं राज्य असलेल्या नांदूर गावात येतात. तिथं त्यांची निंबा दैत्याशी लढाई होते. ही लढाई ज्या ठिकाणी झाली ती टेकडी गावाजवळच असल्याचा दावा गावकरी करतात.
या लढाईत निंबा दैत्य जखमी होतो. जखमी झालेला निंबा दैत्य प्रभू श्रीरामाचा धावा करतो. एक दैत्य प्रभू श्रीरामांचा भक्त असल्याचं पाहून हनुमानही आश्चर्यचकीत होतात. प्रभू श्रीराम प्रसन्न होऊन निंबा दैत्यासमोर प्रकट होतात. ते निंबादैत्याला वेदनेतून मुक्ती दिली. शिवाय त्याला या गावात तुझंच गुणगाण गायलं जाईल. या गावात तुझंचं मंदिर उभं राहिल असा आशीर्वाद देतात.
निंबादैत्य या आशीर्वादावर एक शंका घेतात. हनुमानाचं मंदिर तर प्रत्येक गावात आहे मग माझी पूजा या गावात कशी होणार… तर यावरही प्रभू रामानं एक उपाय सांगितला.. नांदूर गावाच्या नावात तुझ्या नावाचा समावेश होईल एवढंच नव्हे तर या गावात हनुमानाचं मंदिर नसेल असं सांगितलं. तिथून या गावाचं नाव दैत्यनांदूर पडलं शिवाय या गावचं ग्रामदैवतही दैत्यनांदूरच झाला.
दैत्य म्हटलं तर मांसाहाराचा नैवेद्य असा सामान्यांचा समज असतो.. पण यालाही निंबादैत्य महाराज अपवाद आहेत. निंबादैत्याला पुरणपोळीचा नैवेद्य रोज दाखवला जातो. रोज गावातील वेगवेगळ्या घरी नैवेद्य तयार केला जातो. माणसाची देवावर श्रद्धा असते. तरी दैत्यनांदूर गावातील प्रत्येक माणसाची या निंबादेत्यावर श्रद्धा आहे. दैत्य जरी असला तरी त्याची देव म्हणून या गावात पूजा होते. आम्ही निंबा दैत्याचे भक्त आहोत हे गावकरी अभिमानानं सांगतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी गावात निंबा दैत्याची जत्रा भरते. जत्रेच्या दिवशी निंबादैत्याची गावात पालखी निघते.. दोन दिवस हा यात्रोत्सव चालतो…या गावातून लग्न करुन नेलेल्या माहेरवाशीणींना यात्रेची ओढ असते. महिला यात्रेसाठी हमखास गावात येतातच.
निंबादैत्य हे फक्त हिंदू धर्मियांचं दैवत नाही. गावातील मुस्लीम कुटुंबही दैत्याची पूजा करतात. रोज संध्याकाळी मुस्लीम भाविक मंदिरात हमखास जातातच असं सांगतात. मुस्लीमांच्या घरातही निंबादैत्याचं नैवेद्य तयार होत असतो.
गावक-यांची देवापेक्षा निंबादैत्यावरच जास्त श्रद्धा असल्याचं ठायीठायी दिसतं. बाईकच्या दर्शनी भागावर निबांदैत्य प्रसन्न असं अभिमानानं लिहलेलं दिसतं. एवढंच नाहीतर गावातल्या अनेक दुकानांच्या पाट्यांवर निंबादैत्य प्रसन्न लिहलेलं दिसतं. घरांवरही लिंबादैत्याचंच नाव अभिमानानानं लिहिलेलं दिसतं.. महाराष्ट्रात गाव तिथं वेगवेगळ्या परंपरा आहेत. दैत्यनांदूर गावातील निंबादैत्याच्या पूजेची ही परंपरा महाराष्ट्रातल्या हजारो गावांपासून या गावाला वेगळं सिद्ध करते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.