
Elections Announced For 7 Rajya Sabha Seats: देशभरातील राज्यसभेच्या 37 जागांसाठीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांचा समावेश आहे. राज्यसभेतील शरद पवार, फौजिया खान, रजनी पाटील रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, भागवत कराड या नेत्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. या 7 जागांसाठीच्या निवडणुका 16 मार्च 2026 रोजी होणार आहेत आणि त्याच दिवशी निकालही लागणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलल्या कार्यक्रमानुसार…
दरम्यान निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या निवडणुकांसाठी उमेदवारांना 26 फेब्रुवारी पासून अर्ज भरता येणार आहेत. तसेच 5 मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 6 मार्च रोजी या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 9 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत पार पडणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
पवार कुटुंबातील आजोबा-नातू एकाचवेळी राज्यसभेवर
दरम्यान, राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात महाविकास आघाडी शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. शरद पवार यांच्या नावाला उद्धव ठाकरेंची सहमती असून काँग्रेसही सकारात्मक असल्याची माहिती आहे. मविआकडे 46 आमदारांचे संख्याबळ असून एक उमेदवार निवडून येण्यासाठी 41.5 चा कोटा आवश्यक आहे. त्यामुळे मविआमकडून शरद पवार हे एकमेव उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून पार्थ पवार यांचे नाव निश्चित
तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून पार्थ पवार यांचेही नाव निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. राष्ट्रवादीकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक खासदार हमखास राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. पार्थ पवार जर राज्यसभेवर गेले तर पवार कुटुंबातील आजोबा- नातू असे दोघेजण एकाचवेळी राज्यसभेवर असतील. तर राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबतचा निर्णय पक्षाची कोअर कमिटी घेईल असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. तर राज्यसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ. एकत्र बसून या निवडणुकीसंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
भाजपकडून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
दरम्यान, महाराष्ट्र राज्यसभेच्या जागांसाठीचे समीकरण विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार ठरते. सध्याच्या समीकरणानुसार भाजपचा वरचष्मा असून महायुतीला 6 जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याची संधी आहे, तर मविआला एक किंवा दोन जागा मिळवणे आव्हानात्मक आहे. मात्र महायुतीला मिळालेल्या 6 जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये कसे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाजपकडून अधिकचा उमेदवार न दिल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



